पुणे – सोलापूर महामार्गावरील चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज
पुणे – पुणे – सोलापूर परिसरातील नागरिकांना आपला पिरवास सुखकर व्हावा यासाठी पुणे – सोलापूर महामार्गाची निर्मिती करण्यात आली. तसेच पुण्यातील लोणी काळभोर, उरुळी कांचन, दौंडकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी यासाठी हा प्रशस्त रस्ता तयार करण्यात आला आहे. परंतु सध्या या सुसाट महामार्गावरील प्रवाशांना मात्र लुटारूंच्या शर्यतीतून जीवघेणा प्रवास थांबणार तरी कधी? याकडे पुणे, सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
गेल्या आठवड्यात दौंड शहरातून 30 लाखांच्या दागिन्यांची पिशवी पळवल्याची घटना घडली. चोरट्याने 30 लाखांचा डाव साधल्याने दौंड शहरात भितीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर दौंड तालुक्यातील यवत येथे बसमधील एका प्रवाशाला मारहाण करीत त्याच्याकडील 24 लाखांची रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. 6) सकाळच्या सुमारास घडली. याबाबत यवत पोलिसांत फिर्याद दाखल आहे. परंतु याही घटनेचा अद्याप तपास सुरू आहे. त्यातच भर म्हणजे हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती हद्दीतील पेट्रोलजन्य पदार्थ चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत खबर मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी नुकताच इंधन चोरीच्या अड्ड्यावर छापा टाकुन दोन टॅंकरसह 80 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच शेतमालाची विक्री करुन घरी निघालेल्या शेतकऱ्यांना पुणे – सोलापूर महामार्गावर कवडीपाट ते यवत यादरम्यान रस्त्यात मारहाण करुन त्यांच्याकडील रोख रक्कम व इतर किंमती ऐवज लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. शुक्रवारी उरुळी कांचन हद्दीत पुणे – सोलापूर महामार्गावर भरदिवसा दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी माढा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांना मारहाण करुन, त्यांच्या जवळील रोख रक्कम व टेम्पोमधील किंमती ऐवज लुटल्याची घटना घडली. वरील सर्व घटना एका आठवड्यातील आहेत. त्यामुळे हा महामार्ग लुटारूंचा मार्ग म्हणून नावारुपाला येऊ लागला आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार?
दुचाकीवरुन येऊन शेतकऱ्यांना मारहाण करुन लुटणारी टोळी दिवाळी सणाच्या तोंडावरच पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट ते यवत दरम्यान सक्रीय झाली आहे. शेतकरी, शेतकरी, प्रवाशांची वाहने थांबवून चालक व शेतकऱ्यांना मारहाण करतात. तसेच त्यांच्याकडील किंमती ऐवजही लुटुन नेतात. त्यामुळे या महामार्गावरील चोरट्यांचा महामेरू कायमचा रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार? याकडे महामार्गावरील ग्रामस्थ, प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
राहुल गणगे