माळेगाव/ जळोची -पुण्यात किरीट सोमय्या गेले होते, त्यावेळी कोणी रडीचा डाव केला होते. तत्त्वज्ञान जेव्हा आपण सांगतो. तेव्हा आपल्यापासून त्याची सुरुवात केली पाहिजे. अशी अपेक्षा आहे. अन्यथा लोक हे राजकीय नेत्यांना ढोंगी समजतील, असा टोला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला.
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत अजित पवार यांनी शिंदे सरकारने रडीचा डाव खेळू नये असे वक्तव्य केले होते.. यावर मुनगंटीवार म्हणाले की, किरीट सोमय्या असो वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा आदित्य ठाकरे असो. कोणावर ही असा प्रकार होता कामा नये. मात्र, असे प्रकार करणारे कोण आहेत, हे बघितले पाहिजे.
ते म्हणाले की, विरोधकांना महागाईबाबत काही देणं घेणं नाही. ते केवळ महापुरुषांच्या नावाने राजकारण करीत आहेत. महागाई आहे तर त्याबाबत विधानसभेत विषय मांडता येतो. विधानसभेत चर्चा घडवता येते. रोटी कपडा और मकान चित्रपटातील उदाहरण देत मुनगंटीवार यांनी विरोधकांवर लक्ष्य केले.
राज्य चालायचे थांबले आहे काय?
मंत्रिमंडळ विस्तारावर मुनगंटीवार म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने राज्य चालायचे थांबले का, असा प्रति सवाल करीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एक वर्ष झाल्याच नाहीत. म्हणून काय काम थांबले आहे का? मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही म्हणून राज्य अधोगतीकडे चालले आहे. प्रगती थांबली, असे नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व 18 मंत्री अशा 20 जणांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्याची यादी मी देऊ शकतो.