अधिसूचना निघूनही हालचाल शून्य; पर्यटन विकास रखडला
सूर्यकांत पाटणकर
पाटण – जिल्ह्यातील पाटण, सातारा, जावळी या तालुक्यांमधील 52 गावांचा नवीन महाबळेश्वर प्रकल्पात विकास करण्याचा मानस राज्य सरकारने दि. 13 सप्टेंबर 2019 रोजी अधिसूचना काढून व्यक्त केला. त्यानंतर या प्रकल्पाबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने पर्यटनप्रेमींमध्ये नाराजी आहे. जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी नवीन महाबळेश्वर प्रकल्प होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून नवीन महाबळेश्वर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मात्र, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि इको-सेन्सिटिव्ह झोन संदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घातलेल्या अटी, मर्यादा आणि नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर या सत्तेतील घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नवीन महाबळेश्वरबाबत त्वरित कार्यवाही सुरू केली जाईल, असे वाटले होते; परंतु या प्रकल्पाबाबत पाऊल उचलल्याचे निदर्शनात येत नाही. ज्या गावांमध्ये किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवती होणाऱ्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींबाबत किंवा आराखड्याची माहिती कोणत्याही गावातील जमीनमालकांना मिळालेली नाही. व्याघ्र प्रकल्पामुळे येथील जमिनीच्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे.
नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या नवीन अधिसूचनेत आंबेघर तर्फ पाटण, गाढखोप, चिरंबे, नहिंबे, कारवट, दास्तान, रासाठी, देवघर तर्फ हेळवाक, घोषटवाडी, आरल, कुसवडे, बाजे, घाणबी, बोंद्री, वांझोळे, चाफोली, दिवशी खुर्द, काठी, नानेल, सावरघर, वाटोळे, गोजेगाव, खिवशी, वाजेगाव, भांबे, घेरादातेगड, भारसाकळे या गावांचा समावेश आहे.
देसाई-पाटणकर यांचाही आग्रह
पर्यटनाच्या दृष्टीने पूरक असलेल्या ठिकाणी पाटण तालुक्यात नवीन महाबळेश्वर प्रकल्प साकारला जाणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प काहींनी तालुक्याच्या बोकांडी बसवल्याने नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला खीळ बसली. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने या प्रकल्पाला चालना मिळावी यासाठी ना. शंभूराज देसाई व विक्रमसिंह पाटणकर हे दोघेही आग्रही आहेत.
महत्त्वाकांक्षी प्रकल्प
नवीन महाबळेश्वरची संकल्पना सर्वप्रथम माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी मांडली. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात तीन हजार हेक्टर जमिनीवर नवीन महाबळेश्वर प्रकल्प खाजगी तत्त्वावर उभाण्याची कल्पना होती आणि कामाला प्रारंभही झाला. मात्र, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे हा प्रकल्प रेंगाळला. सरकारने नवीन महाबळेश्वरची घोषणा करताच सत्यजित पाटणकर यांनीही वाट्टेल ते झाले तरी नवीन महाबळेश्वर प्रकल्प साकारणारच, असा चंग बांधला आहे. पाटण तालुक्याच्या पर्यटन वाढीसाठी हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी ठरणार आहे.