राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने आणि विचारांनी पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका शिक्षिकेला जाळून मारण्याचा झालेला प्रयत्न म्हणजे विकृत अशी “छपाक संस्कृती’ अद्यापही भारतात जिवंत असल्याचे उदाहरण मानावे लागेल. राजधानी दिल्लीत काही वर्षांपूर्वी घडलेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपींना फाशी देण्याची प्रक्रिया दिवसेंदिवस विविध कारणांनी लांबत असतानाच हिंगणघाटची ही घटना घडलेली आहे, हे विशेष लक्षणीय मानावे लागेल. बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला आणि ऍसिड हल्ला या विषयाला वाहिलेला “छपाक’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता.
महिलांवरील ऍसिड हल्ला या विषयावरील या चित्रपटाला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नसला तरी एका विषयाला तोंड फोडण्याचे काम या चित्रपटाने केले होते. या चित्रपटाची चर्चा सुरू असतानाच हिंगणघाटमध्ये एका शिक्षिकेला तिच्या विवाहित प्रियकराने एकतर्फी प्रेमातून जाळून मारण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे या चित्रपटात दाखवलेली संस्कृती किती टोकाला गेली आहे याचे दुर्दैवी उदाहरण म्हणावे लागेल. हिंगणघाटमधील घटनांनंतर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विशेषतः महाविद्यालयीन युवती आणि महिलांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हैदराबादमधील डॉक्टर तरुणीला जाळून मारण्याच्या घटनेनंतर ज्याप्रकारे संबंधित गुन्हेगारांना एन्काउंटरमध्ये ठार मारण्यात आले होते त्याच प्रकारे या घटनेतील गुन्हेगाराला ठार मारण्यात यावे, अशी टोकाची प्रतिक्रिया याप्रकरणी देण्यात आली आहे. ही प्रतिक्रिया महिलांची आहे हे विसरता येणार नाही.
हिंगणघाटमधील या घटनेपूर्वी काही दिवस अगोदरच जालना जिल्ह्यात एका गावामध्ये एक तरुण आणि तरुणी यांच्याबाबत झालेल्या दुष्कृत्याची माहितीही समोर आली होती. फिरायला गेलेल्या या जोडप्याबाबत ज्याप्रकारे गैरव्यवहार करण्यात आला होता तो निश्चितच चीड आणणारा होता. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या टोळक्यांवर वेळीच कारवाई झाली नाही तर त्यांची मजल अधिक गंभीर गुन्हे करण्यापर्यंत वाढते. अशा प्रकारच्या घटनांमुळे लगेचच राज्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे, असा निष्कर्ष काढणे चुकीचे असले तरी अशा विकृत गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्यासाठी कायद्याने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणातील बलात्कारी आरोपांची फाशी विविध कारणांनी लांबत असतानाच ही घटना घडली असल्याने अशा प्रकारच्या गुन्हेगारांना शासन करण्यात कायदा कमी पडतो की काय, अशी शंका सामान्य नागरिकांना येत असल्यास त्याचा दोष त्यांना देता येणार नाही.
महिलांबाबत घडलेल्या अशा कोणत्याही गुन्ह्यांची चर्चा सुरू झाली की अशा प्रकारचे खटले “फास्ट ट्रॅक न्यायालयात’ चालवले जातील आणि गुन्हेगारांना तातडीने शासन केले जाईल, असे आश्वासन सरकारकडून दिले जाते; पण मुळात राजधानी नवी दिल्लीतील एखाद्या घटनेतील पीडितेला न्याय मिळायला दहा वर्षे जात असतील तर देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या छोट्या मोठ्या गावांमध्ये महिलांबाबत घडणाऱ्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यात किती विलंब लागत असेल याची कल्पनाच केलेली बरी. हिंगणघाट घटनेनंतर शाळकरी मुलींनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना अशा गुन्ह्यातील गुन्हेगारांना एन्काउंटर पद्धतीने शासन द्यावे, अशी सूचना केली आहे. त्यामुळे समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंत यांना धक्का बसणे शक्य आहे; पण विद्यमान परिस्थितीबाबत हतबलता व्यक्त करण्याच्या निमित्तानेच अशा प्रकारच्या टोकाच्या सूचना केल्या जात आहेत, याकडे दुर्लक्ष होता कामा नये. लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या खूपच कमी असल्याने गुन्हे कमी करणे किंवा गुन्ह्याला प्रतिबंध करणे हे पोलिसांच्या हातात नसले तरी गुन्हा घडल्यावर संबंधित गुन्हेगारांना त्वरित आणि कठोर शासन देणे हे पोलिसांच्या हातात असते हे शासन जलद दिले गेले तर संभाव्य गुन्हेगारांना जरब बसू शकतो.
न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे न जाता गुन्हेगारांना एन्काउंटरमध्ये मारणे हे कधीही चुकीचे असले तरी सामान्य नागरिकांना अशाच प्रकारच्या शिक्षेची अपेक्षा आहे हे विसरून चालणार नाही. सामाजिक व्यवस्था आणि सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून आता कायदा व सुव्यवस्थेने स्वतःचे हातपाय जलद हलवण्याची गरज निर्माण झाली आहे. छपाक चित्रपट ज्या युवतीच्या आयुष्यावर आधारित होता त्या लक्ष्मी अग्रवालने गेल्या काही वर्षांपासून ऍसिड विक्रीवर बंदी घालावी यासाठी आंदोलन सुरू केले आहे; पण अद्यापही या आंदोलनाला यश आलेले नाही हे या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. नवी दिल्लीतील निर्भया प्रकरण असो किंवा ताजे हिंगणघाटमधील शिक्षिकेला जाळण्याचे प्रकरण असो अशा घटना घडल्या की सर्वच पातळीवर चर्चा सुरू होतात; पण कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत कोणतीच पावले उचलली जात नाहीत.
कायद्याची जलद प्रक्रिया आणि गुन्हेगारांना त्वरित शासन या जोडीला सामाजिक प्रबोधनाची चळवळ राबविण्यात आली तर छपाक संस्कृतीला पूर्णविराम मिळू शकेल अन्यथा अशा प्रकारच्या घटना घडतच राहतील आणि अशा प्रकारच्या चर्चा झडत राहतील. हिंगणघाट घटनेतील गुन्हेगार विवाहित आहे. त्याला एक लहान मुलगी आहे. त्याच्या कुटुंबीयांचा कोणताही दोष नसताना त्यांना सामाजिक रोषाला सामोरे जावे लागत आहे. तर पीडित शिक्षिकेचे आयुष्यच बरबाद झाले आहे. ही पीडिता सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. ती बरी झाल्यानंतरही तिला या घटनेचे चटके जाणवणार आहेत. अशा विकृत घटनेने अनेक कुटुंबांना आयुष्यभर त्रास होतो म्हणूनच अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सोशल माध्यमाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि घराघरात पोहोचलेल्या इतर अनेक माध्यमांच्या या जगात एखाद्या घटनेचे अनेक पदर आणि त्यातून कदाचित चुकीची मानसिकता तयार होऊ शकते. अशा वेळी कायदा आणि न्यायव्यवस्थेने आपली जबाबदारी जलद आणि कार्यक्षमतेने पार पाडावी एवढीच सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.