Bishan Singh Bedi Passes Away : भारतात खेळल्या जाणार्या वनडे वर्ल्ड कप 2023 दरम्यान क्रीडा जगतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज लेफ्ट आर्म स्पिनर बिशनसिंग बेदी यांचे निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. बेदी हा भारतीय क्रिकेटचा चेहरा होता जो केवळ मैदानावरील त्याच्या कामगिरीनेच चमकला नाही तर त्याच्या नेतृत्वाने एक आदर्शही ठेवला आणि त्यांनी आपले विचार व्यक्त करण्यात कधीही मागेपुढे पाहिले नाही. भारतीय भूमीतून तसेच परदेशातही त्यानी आपल्या फिरकीच्या जाळ्यात बड्या दिग्गजांना अडकवले.
पाकिस्तानच्या बेईमानीवर बेदींना आला होता राग…
1960-70 हे दशक बेदींच्या नावावर होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यादरम्यान बेदींनी फलंदाजांना अडचणीत आणले होते. बेदी यांची क्रिकेट कारकीर्द जवळपास 12 वर्षे चालली, या काळात त्यांनी रागाच्या भरात अनेक मोठे निर्णय घेतले, जे खूप वादग्रस्तही होते. अनेकवेळा त्यांच्यावर टीकाही झाली.
बेदी उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीव्यतिरिक्त त्यांच्या स्पष्ट विधाने आणि आक्रमक वृत्तीसाठी देखील ओळखले जातात. 22 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवणारे बेदी हे अत्यंत निडर आणि स्पष्टवक्ते कर्णधार होते. 1978 मध्ये त्याने असे काही केले ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बेदींनी भारतीय फलंदाजांना माघारी बोलावले होते आणि संपूर्ण सामना न खेळता पाकिस्तान संघाने सामना जिंकला होता.
नेमकं काय घडलं होतं….
1978 साली भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला. या दौऱ्यात भारताला तीन वनडे आणि तीन कसोटी सामने खेळायचे होते. भारताने पहिली वनडे चार धावांनी जिंकली होती, मात्र दुसऱ्या वनडेत टीम इंडियाला आठ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर दोन कसोटी सामने खेळवण्यात आले. पहिली कसोटी अनिर्णित राहिली आणि दुसरी कसोटी पाकिस्तानने आठ गडी राखून जिंकली. यानंतर तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जात होता.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आसिफ इक्बालच्या 62 धावा आणि माजिद खानच्या 37 धावांमुळे पाकिस्तानने 40 षटकात 7 गडी गमावून 205 धावा केल्या. भारताकडून कपिल देव, वेंकटराघवन आणि मोहिंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने चांगली सुरुवात केली होती. चेतन चौहान 23 धावांवर बाद झाले. यानंतर अंशुमन गायकवाड आणि सुरिंदर अमरनाथ यांनी डावाची धुरा सांभाळली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. सुरिंदर 62 धावा करून बाद झाले, पण अंशुमन 78 धावा करून नाबाद होते आणि गुंडप्पा विश्वनाथ आठ धावा करून खेळत होते.
बाऊन्सरचा केला होता निषेध…
भारताला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात 23 धावांची गरज होती. अशा स्थितीत पाकिस्तानच्या सरफराज नवाजने सतत बाऊन्सर फेकण्यास सुरुवात केली. त्यावेळी बाऊन्सरच्या उंचीबाबत कोणताही नियम नव्हता. अशा स्थितीत अंशुमनने अंपायरला हस्तक्षेप करण्यास सांगितले, कारण सर्व चेंडू त्याच्या डोक्यावरून खूप वर जात होते. होम अंपायर जावेद अख्तर आणि खिजर हयात यांनी पाकिस्तानचा कर्णधार मुश्ताक मोहम्मदला बाउन्सर टाकू नये, अशी विनंती केली, परंतु त्याने आक्रमक गोलंदाजी मानण्यास नकार दिला. 48व्या षटकातील पहिले चार चेंडूंपैकी प्रत्येक बॉल गायकवाडच्या आवाक्याबाहेरचे होते आणि ते डॉट बॉल होते कारण त्यावेळी बाउन्सर बाऊंड्रीची तरतूद नव्हती. भारतीय कर्णधार बिशनसिंग बेदी विरोधी कर्णधार मुश्ताकशी बोलण्यासाठी बाहेर पडले आणि संभाषणावर नाराज दिसले.
पाकिस्तानकडून सरफराज नवाज गोलंदाजी करत होता. त्याने चिडायच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्याला पंचही मदत करत होते. सरफराजने एका षटकात चार बाऊन्सर टाकले. पण पंचांनी एकाही चेंडू वाईड दिला नाही. काही चेंडू तर फलंदाजाच्या डोक्यावरुनही गेले. पण पंचाकडून काहीही प्रतिक्रिया आली नाही. पंच आणि पाकिस्तान खेळाडू बेईमानी करत होते, ते पाहून सर्व भारतीय खेळाडू वैतागले होते. हे सर्व पाहिल्यानंतर बेदींना राग अनावर झाला.
यानंतर बेदीने त्यांचे फलंदाज गायकवाड आणि गुंडप्पा विश्वनाथ यांना पॅव्हेलियनमध्ये परत बोलावले. त्यानंतर मुश्ताक भारतीय ड्रेसिंग रुममध्ये गेला आणि भारतीय संघाला पुन्हा खेळ सुरू करण्यास सांगितले. पण बेदी पाकिस्तानच्या बाउन्सर डावपेचांच्या विरोधात ठाम राहिले आणि त्यामुळे विरोधी संघ सामना आणि मालिका जिंकेल हे माहीत असतानाही त्यांनी पुन्हा खेळ सुरू करण्यास नकार दिला आणि आपला निर्णय मागे घेतला नाही. त्यानंतर पाकिस्तानला विजय घोषित करण्यात आले होते. आणि त्यांच्या संघाला सामना आणि 2-1 ने मालिका गमवावी लागली होती. मात्र, तरीही त्यांनी अन्यायापुढे झुकण्यास नकार दिला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं होतं की जेव्हा पंचांचा निर्णय न जुमानता कर्णधाराने स्वतः प्रतिस्पर्ध्याला हातचा विजय काढून दिला होता. अशा प्रकारे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विरोधी संघाला सामना जिंकून देणारे बिशनसिंग बेदी हे पहिले कर्णधार ठरले होते.