पुणे – राज्यातील दिग्गज नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यामुळे आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील सुरक्षा कपातीवरून सरकरावर टीका केली आहे. सुरक्षेत कपात करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा देखील समावेश आहे.
राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केल्यानंतर मनसे नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी सरकारला सवाल केला. ज्या नेत्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा आहे, त्यांची झेड दर्जाची सुरक्षा कमी करून काय तीर मारणार. अखेर महाविकास आघाडी सरकार देखील कुच्या मनाचेच निघाले. भाजपने सत्तेत असताना जे केले तशाच नीच खेळ्या महाविकास आघाडीचे सरकार करत असल्याची सडकून टीका पाटील यांनी केली.
ज्याच्या कडे एवढी महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा आहे त्यांची काय झेड सुरक्षा काढून तीर मारणार आहात
शेवटी महविकास आघाडी पण…
Posted by Rupali Patil Thombare on Saturday, 9 January 2021
रुपाली पाटील-ठोंबरे यांच्या व्यतिरिक्त किर्तीकुमार शिंदे यांनी देखील सरकारवर टीकास्त्र सोडले. राज ठाकरे यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या अगणित महाराष्ट्र सैनिकांच्या या सुरक्षाकवचात ना कधी कपात होऊ शकते, ना ते कोणी भेदू शकतो.
तत्पूर्वी महाविकास आघाडी सरकारने दोन दिवसांपूर्वी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, आमदार राम कदम यांना आता विशेष सुरक्षा नसणार. यामध्ये आणखी काही भाजप नेत्यांचा समावेश आहे.