एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. नोकरदार असो किंवा व्यावसायिक मंडळी असो प्रत्येकजण आपापल्या परीने गुंतवणूकीचा विचार करत असतात. आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवीन योजना जोडल्या जातात किंवा काही योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय देखील घेतला जातो. आपणही नव्या आर्थिक वर्षात गुंतवणुकीचा आढावा घेत असाल तर काही गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्या गोष्टीमुळे आपला पैसा बाहेर जात असेल तर तेथे अधिक लक्ष द्यायला हवे. असे करण्याने पोर्टफोलिओत वैविध्यपणा येईल आणि आपले नुकसानही होणार नाही.
* महागाई: आपल्या गुंतवणुकीवर सर्वाधिक परिणाम हा महागाईचा होतो. जोखीम आणि उत्पन्नानुसार आपण गुंतवणुकीचा पर्याय निवडतो. गुंतवणूक योजनेवर मिळणाऱ्या परताव्याची महागाई दराशी तुलना करावी. यानुसार आपण योग्य उत्पादन निवडू शकतो आणि अंदाजित परतावा खिशात येऊ शकतो.
* टाळाटाळ: गुंतवणुकीबाबत निर्णय घेताना काही जण अकारण विलंब लावतात किंवा वेळ घेतात. त्यामुळे नकारात्मक परिणाम पदरी येतात. अधिक वेळ घेतला तर आर्थिक ध्येय गाठण्यासाठी तितकाच वेळ लागेल. तसेच कालापव्यय किंवा विलंब झाल्यामुळे अधिक रक्कम गुंतवावी लागेल. म्हणून गुंतवणुकीबाबत निर्णय घेताना अकारण वेळ दवडू नये.
* हेल्थकेअर: आर्थिक नियोजन करताना आपल्या हेल्थकेअरकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण वयानुसार आरोग्याच्या कुरबुरी वाढतात. त्यामुळे नियोजन करताना आरोग्याचा विचार प्राधान्याने करायला हवा. आरोग्य विमा असणे गरजेचे आहे. आपण याकडे दुर्लक्ष केले तर आणीबाणीच्या काळात आपला खिसा रिकामा होऊ शकतो.
* कमी व्याजदर : गुंतवणुकीची योजना निवडताना त्याचा व्याजदर आणि परतावा किती आहे, याचे आकलन करायला हवे. कोणाच्याही सांगण्यावरून प्रॉडक्टची निवड करू नये. अन्यथा कमी व्याजावर मोठी गुंतवणूक अडकून पडू शकते. योजनांची तुलना करूनच गुंतवणूक सुरू करावी. केवळ कर वाचवण्यासाठी महागाईदरापेक्षा कमी व्याज देणाऱ्या किंवा त्यापेक्षा कमी परतावा देणाऱ्या योजनेत पैसे गुंतवू नये.
* कराचा परिणाम: नोकरदार किंवा व्यावसायिक वर्गावर होणारी कर आकारणी महत्त्वाची असते. आपले उत्पन्न लक्षात घेऊन करबचतीची तयारी आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच करायला हवी. त्याचा फायदा म्हणजे सुरवातीलाच कराचे नियोजन केल्यास टीडीएसपासून दिलासा मिळतो. तसेच शेवटच्या क्षणी अनावश्यक आणि घाईगडबडीत करबचत देणाऱ्या योजना खरेदी करण्याची वेळ येत नाही.