पुणे – राज्य शासनाने गट ब (अराजपत्रित), गट क आणि गट ड संवर्गातील सरळसेवेची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात यावी, अशी मागणी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राज्य शासनाने या संवर्गातील सरळसेवेची पदभरती जिल्हा, प्रादेशिक आणि राज्यस्तरीय निवड समितीमार्फत आणि खासगी कंपनीद्वारे ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातूनच घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयावर विविध विद्यार्थी संघटना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून होत आहे. आता खुद्द बच्च कडू यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.
वास्तविकत: खासगी कंपन्याची विश्वासार्हता ढासळलेली असून, त्यांच्याकडून स्पर्धा परीक्षा घेताना केलेल्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे दिसून आली आहेत. त्यामुळे खासगी कंपन्यांकडून सुशिक्षित बेरोजगार तरुणांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व गोष्टीचा विचार करता ही पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्यास पारदर्शकता येऊ शकते. केरळ सारख्या राज्यात देखील गट ब (अराजपत्रित), गट क आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशनाची पदे एमपीएससीकडून भरण्यात येतात. सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या या मागणीचा विचार करून खासगी कंपन्याद्वारे घेण्यात येणार असल्याच्या निर्णय मागे घ्यावी, अशीही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.