मुंबई – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठी हल्ला केल्यानंतर मराठा आरक्षण मागणीला चांगलाच जोर आला आहे. या घटनेपासूनच मनोज जरांगे पाटील हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या आरक्षणाच्या लढ्यात सहभागी झाले आहेत. अशातच मुंबईत एक धक्कादायक घटना घडली असून सुनील कावळे (वय 45) यांनी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे.
कावळे यांनी मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पुलाच्या खांबाला गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी कावळे यांनी मराठा आरक्षण मिळण्यासाठी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिले आहे. ते पत्र आत प्रसार माध्यमांवर व्हायरल होत आहे.
कावळे यांनी लिहिलेल्या पत्रात काय आहे ?
“महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानी माता हिंदूधर्मरक्षरक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा..
जय भवानी जय शिवाजी..
मी सुनील बाबूराव कावळे,
मु. पो. चिकणगाव,
तालुका अंबड, जिल्हा जालना
एकच मिशन, मराठा आरक्षण, एक मराठा लाख मराठा… साहेब आता कोण्या नेत्याच्या सभेला जायचं नाही. ऑक्टोबर 24 हा मराठा आरक्षण दिवस, या मुंबईमध्येच… आता माघार नाही. कोणी काहीही बोलू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांचं नाव तोंडातून काढू नका आता फक्त आणि फक्त मराठा आरक्षणासाठी या मुंबईमध्ये उपोषणाला बसू. ऊठ मराठा जागा हो… पण लक्षात ठेवा, शांततेत यायचंय… शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे. मराठा शेतकरी मुला-मुलींच्या शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे. सण-वार काय येत राहतील, पण आता एकच मिशन मराठा आरक्षण संत, महंत आणि कीर्तनकारांनी कीर्तनातून मराठा आरक्षण समजावलं.
आपण चार पाच दिवस उपोषण केलं, तर कुणी मरत नाही… कोरोनाचं संकट आलंच होतं ना? दोन महिने घरात बसलेच होते ना? काय झालं? चारपाच दिवस शाळेत गेलं नाही, तरीही काहीही फरक पडत नाही. लढा गरजवंतांचा, लढा निष्ठावंतांचा लढा शौर्यवंतांचा बहुसंख्य असूनही शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या मराठ्यांचं आता एकच मिशन…. आधी मराठा आरक्षण… मगच इलेक्शन मला वाटलं, मी केलं… मला मोठ्या मनाने माफ करा! मी क्षमा मागतो.
सर्वांनी मला माफ करावं.”
दरम्यान, आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका, असे आवाहन मराठा आरक्षणाच्या लढ्यातील विनोद पाटील यांनी केले आहे. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका! सरकारला विनंती की, यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही. यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे. हुतात्मा सुनील बाबुराव कावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मनोज जरांगे काय म्हणाले ?
सरकारने बळी घ्यायचे का ठरवले आहे हे कळत नाही. सरकारमुळे बळी पडायला लागले आहेत. भावांनो आरक्षण मिळणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. खूप वर्ष दम धरला आहे. थोडे दिवस आणखी दम धरा. तुमच्या पायाला हात लावून सांगतो पोरं जायला लागले, आत्महत्या करायला लागले तर आरक्षण घेऊन उपयोग काय? तुम्ही दम धरा. पण हे सगळं पाप सरकारचं आहे. सरकारला किती मुडदे पाडायचे आहेत माहीत नाही. एक माणूस कमी झाला. याला पूर्ण जबाबदार सरकार आहे. आता तरी त्याचं बलिदान वाया जाऊ देऊ नये. सरकारने आता तातडीने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. 24 तारखेनंतर होणारं आंदोलन सरकारला परवडणार नाही.