नवी दिल्ली – उन्हाळा आला की सोबत दुष्काळ घेऊन येतो. हे समीकरण मागील बऱ्याच वर्षांपासून जुळून येत आहे. भारतातील अनेक गाव आहेत जिथे आजही पाणी प्रश्न सोडविण्यात सरकरला यश मिळाले नाही. अशात ऐन उन्हाळ्यात एका सरकारी अधिकाऱ्याने लाखो लिटर पाणी वाया घालवलेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,’पंखजूरमध्ये एका अन्न निरीक्षक अधिकाऱ्याने पाण्यात पडलेला आपला महागडा मोबाईल परत मिळवण्यासाठी लाखो लिटर धरणातील पाणी वाया घालवले आहे. एका फोनसाठी वाया घालवलेल्या या पाण्यात दीड हजार एकर शेत भिजवता आलं असतं. एवढं करून अधिकाऱ्याचा मौल्यवान मोबाईल सापडला, मात्र तो खराब झाला आहे.
कोयलीबेडा ब्लॉकचे अन्न अधिकारी रविवारी सुट्टीसाठी खेरकट्टा परळकोट जलाशयावर पोहोचले होते. खेरकट्टा पर्लकोट जलाशयाच्या ओव्हर ब्रिजवर 15 फुटांपर्यंत भरलेल्या पाण्यात अधिकाऱ्याचा महागडा मोबाईल कुठे पडला हे शोध घेण्यासाठी अधिकाऱ्याने आधी जवळच्या गावकऱ्यांना मोबाईल शोधण्यात गुंतवले. पण त्यात फक्त अपयशच आले.
यानंतर फोन काढण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर 30 एचपी क्षमतेचा पंप बसवून जलाशयातील पाणी बाहेर काढण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून पाणी काढण्यासाठी पंप सुरू होता.
मात्र, जलाशयातून सातत्याने पाणी उपसा होत असल्याची बाब वरपर्यंत पोहोचल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिथे पंप बंद होता. त्यानंतर पुन्हा शोध घेतला असता मोबाईल सापडला, मात्र तो खराब झाला होता.
अंदाजानुसार, गेल्या सोमवार ते गुरुवारपर्यंत सलग 24 तास 30 अश्वशक्तीच्या दोन डिझेल पंपांमुळे सुमारे 21 लाख लिटर पाणी वाया गेले. हे पाणी दीड हजार एकर जमीन सिंचनासाठी पुरेसे होते. एवढ्या कडक उन्हाळ्यातही सिंचनाच्या पाण्याची नासाडी केली गेली.कदाचित परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनापेक्षा अधिकाऱ्याच्या महागड्या फोनची किंमत जास्त आहे.