आंबेगाव बुद्रुक -कात्रज-आंबेगाव-भारती विद्यापीठ-दत्तनगर-आंबेगाव पठार परिसरातील पाणीपुरवठा मुबलक व सुरळीत होण्यासाठी 2017 पासून पाठपुरावा करून, 40 लाख लिटर क्षमतेच्या साठवण टाकीची मंजुरी व जागा मिळवली आहे. या प्रक्रियेस विलंब झाला, त्यातच नवीन भर म्हणजे चार महिन्यांपूर्वीच निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असताना वेगाने काम होणे गरजेचे असताना अद्यापही किरकोळ काम सुरू आहे. महापालिकेचे अधिकारी करतात तरी काय? असा सवाल करीत माजी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी संताप व्यक्त केला.
आंबेगाव पठार येथील प्रकल्पाच्या कामाची पाहणी बेलदरे यांनी अधिकाऱ्यांसह केली. बेलदरे यांनी सांगितले की, मार्च 2024 पर्यंत सद्यस्थितीतील टाकीलगतच पंपिंग स्टेशनचे काम होणे गरजेचे आहे. यासोबतच टाकीचे काम चार महिन्यांपूर्वीच सुरू झाले असते, तर नक्कीच पाण्याची टाकी देखील वापरात आली असती, याचा फायदा सुरुळीत पाणी पुरवठा करण्यास झाला असता. मंजुर व निविदा प्रक्रिया पूर्ण झालेले काम सुरू होण्यास जेवढा वेळ लागेल, तेवढाच प्रकल्पाच्या खर्चात वाढ देखील होईल ही बाब अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवी. परंतु, या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा प्रकार म्हणजे जनता उपाशी अन् ठेकेदार तुपाशी असा झाला आहे.
सदर कामाची पाहणी पाणीपुरवठा अधिकारी खुडे साहेब यांच्या सोबत करून काम लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केली, जर काम सुरू झाले नाही तर महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहे.
– युवराज बेलदरे, माजी नगरसेवक, आंबेगाव बु.