मांजरी -मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना रस्ते, पथदिवे विशेषत: तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. अनेकवेळा मागणी करूनही प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. परिसरातील रस्त्यांवर खड्डे, कालव्यात व नदीपात्रात मोठ्याप्रमाणात वाहून आलेली जलपर्णी अशा अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी आज सुमारे एक हजार नागरिकांचा पुणे महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर मोर्चा काढून “चला जाब विचारू’ आंदोलन करण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्व माजी सरपंच शिवराज घुले, माजी सरपंच अण्णा धारवाडकर, भाजप हडपसर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष संदीप दळवी, माजी उपसरपंच सुमित घुले, समीर घुले, उज्ज्वला टिळेकर, निर्मला म्हस्के, बाळासाहेब घुले, शैलेंद्र बेल्हेकर, सत्यवान घुले, सीमा शेंडे, छाया गदादे, गौरव म्हस्के, गणेश गायकवाड, बाळासाहेब राऊत, सागर प्रभुणे, विद्याधर भोसले तसेच अनेक कार्यकर्ते महिला, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. दरम्यान, आंदोलनातील प्रमुखांनी कर आकारणी व करसंकलन उपायुक्त अजित देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले.
मांजरी बुद्रुक परिसरातून वाढीव आणि भरमसाठ कर आकारणी करूनही नागरिकांना कोणत्याही प्रकारची मूलभूत सुविधा दिली जात नाही. पालिकेत समोवशाच्या नावाखाली सामान्य नागरिकांची केवळ फसवणूक केली जात आहे. ग्रामपंचायत असताना आम्ही राबविलेल्या योजना यापेक्षा बऱ्या होत्या, अशी नागरिकांची भावना आहे.
– पुरूषोत्तम धारवाडकर, माजी सरपंच, मांजरी बु.
मांजरी बुद्रुक गावाचा महापालिकेत समावेश होऊन आठरा महिने झाले आहेत, असे असताना आतापर्यंत पालिकेच्या माध्यमातून गावामध्ये कुठल्याही प्रकारची ठोस विकासकामे झालेली नाहीत. त्यामुळे महापालिकेपेक्षा ग्रामपंचायतच बरी होती, असे म्हणण्याची वेळ आली आहे. रस्ते,वीज, पाणी आणि वाढीव मिळकत करात सवलत या आमच्या मागण्या आहेत.
– शिवराज घुले, माजी सरपंच, मांजरी बु.