लोणी-धामणी, (वार्ताहर) – लोणी धामणी (ता.आंबेगाव ) परिसरातील मांदळेवाडी, वडगावपीर,पहाडदरा गावांमध्ये व वाडया वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या परिसरातील ओढे,नाले,विंधन विहीरी व विहरी कोरडया ठणठणीत पडल्या आहेत.
त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.नागरिकांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने तात्काळ टँकर व जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची मागणी या परिसरातील शेतकरी-ग्रामस्थांनी केली आहे. आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील हा भाग दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.
या परिसरासाठी वरदान ठरणारा म्हाळसाकांत जलसिंचन उपसा सिंचन प्रकल्प अजून कागदावरच आहे. सध्या तालुक्यांतील दोन्ही लोकप्रतिनीधी सत्ताधारी पक्षात आहे त्यामुळे भविष्यात प्रकल्प मार्गी लागेल का नाही, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.
गेली कित्येक वर्षे या गावांना व परिसरातील वाड्या वस्त्यांना सततची पाणीटंचाई आणि दुष्काळाचा दाहक झळा सोसाव्या लागत आहे.पिण्यासाठी व शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे या मागणीकडे शासनाने व राजकीय सर्वपक्षीय नेते मंडळीनी लक्ष द्यावे अशीही मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
टॅंकरचे प्रस्ताव पाठवावेत…
पाणी टंचाई निर्माण झाल्याने वडगावपीर,मांदळेवाडी या गावांचा पाण्याच्या टँकर साठीचा प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाला प्राप्त झालेला आहे. हा प्रस्ताव तात्काळ पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार कार्यालयात पाठवलेला असून तालुक्यातील इतरही कोणत्याही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची आवश्यकता असल्यास त्यांनी तात्काळ प्रस्ताव पाठवावा, अशी माहिती पंचायत समिती कार्यालयाकडून सांगण्यात आली आहे.