Weather Update: राज्यातील काही भागात थंडी तर काही ठिकाणी पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस झाला होता. मात्र, आता हा कमी दाबचा पट्टा विरून गेल्याने राज्यात कोरडे हवामान राहणार आहे.
कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात घट होण्याचा कल आहे. राज्यात सरासरी दोन अंश सेल्सिअसने किमान तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात काही भागात पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे भात पिकांचे नुकसान झाले होते. तसेच ढगाळ हवामानाचा परिणाम देखील पिकांवर झाला होता. सध्या अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्र विरून गेले आहे. यामुळे राज्यात पुढील काही दिवसांत हवामान कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.
मात्र राज्यातील काही ठिकाणी आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी भागात तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.