श्रीनगर – आज प्रत्यक्ष ताबारेषेवर जितके सैनिक उपलब्ध आहेत, त्यात कोणतीही वाढ करण्याची किंवा त्यात कपात करण्याची गरज नाही. आम्ही तेथे अत्यंत प्रभावी उपाययोजना करीत असून, आम्ही घुसखोरांना भारतीय हद्दीत येण्यापासून प्रभावीपणे रोखू, असे काश्मिरात तैनात असलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे.
शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरमध्ये आज पत्रकारांशी बोलताना लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, हिवाळा सुरू होण्यापूर्वी सीमेपलीकडील घुसखोर भारतीय हद्दीत घुसण्याचा शेवटचा प्रयत्न करतील.
त्यातून भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न होईल; पण त्यांना रोखण्यासाठी भारतीय सेना सज्ज आहे. त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत. अलीकडेच उरी आणि रामपूर भागातून आपल्या हद्दीत दहशतवादी घुसवण्याचे प्रयत्न झाले.
पण हे प्रयत्न आम्ही नुसतेच हाणून पाडले नाहीत तर घुसखोरांना आम्ही यमसदनीही धाडले आहे, असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. म्हणून आता सीमेवर जादा सैनिक तैनात करण्याची गरज नाही. काश्मीर खोऱ्यातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न आता पाकिस्तानकडून सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.