भोर – वेल्हे तालुक्यातील चापेट गुंजवणी धरण प्रकल्पातील वाजेघर खोरे, वांगणी खोरे आणि हवेली तालुक्यातील शिवगंगा खोऱ्यातील उपसा जलसिंचन योजनेला 2018 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असताना कृष्णा खोरे विकास महामंडळ प्रकल्पात पाणी उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करून विरोध करत असल्याने आमदार संग्राम थोपटे आक्रमक झाले आहे.
आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे; अन्यथा स्थानिक लोकांच्या प्रक्षोभास शासनास सामोरे जावे लागेल, असा इशारा दिल्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याविषयी खास बाब म्हणून या प्रश्नावर मार्ग काढण्याचे आदेश संबंधितांना दिल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित केली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, पंढरपुरचे आमदार भारत भालके, जलसंपदाचे सचिव संजय घाणेकर, सह सचिव अतुल कपोले, उप सचिव अभय पाठक, चापेट- गुंजवणी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, प्रकल्प अधिकारी शिवाजी पाटील, वेल्ह्याचे सभापती दिनकर सरपाले, संदीप नगिने, गणपत देवगीरीकर उपस्थित होते.
थोपटे म्हणाले की, धरण प्रकल्पात 4.17 टिएमसी पाणी असून यातील 6 टक्के पाणी हे आमच्या हक्काचे पाणी आहे. याचा प्रत्यक्षात वापर होत नसून मंजूर उपसा जलसिंचन योजना झालीच पाहिजे. या योजनेवर वाजेघर येथील 560 हेक्टर, वांगणी योजनेत 630 हेक्टर, शिवगंगा खोऱ्यातील 1272 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
योजनेत भोर तालुक्यातील वेळू, शिंदेवाडी, कुसगांव, खोपी तर हवेली तालुक्यातील खेड, शिवापूर, रहाटावडे या गावांचाही समावेश होत असल्याने ही उपसा जलसिंचन योजना झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका आमदार थोपटे यांनी घेतली. जयंत पाटील यांनी वरील आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देऊन या योजनेला हिरवा कंदील दाखवला असल्याचे त्यांनी सांगितले.
पैठणच्या धर्तीवर गार्डन प्रकल्पाची निर्मिती करा
बैठकीत नीरा देवघर धरण प्रकल्पातील डाव्या कालव्याच्या कामासंबंधी व चापेट गुंजवणी धरण प्रकल्पाच्या खालील बाजूस असलेल्या जलसंपदाच्या मालकीत असलेल्या 150 एकर जागेत पैठणच्या धर्तीवर गार्डन प्रकल्प उभारला जावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच गुंजवणी प्रकल्पातील कानंदी नदीवर वेल्हे बुद्रुक, धानेप हद्दीत बंधारावजा पूल उभारण्याबाबतची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.