मुंबई – महाराष्ट्रात येऊ घातलेला टाटा-एअरबस सी 295 हा एक मोठा प्रकल्प गुजरातला नेण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर चौफेर टीका सुरू झाली आहे. वेदांता हा प्रकल्प गुजरातल्या गेल्याने महाराष्ट्र सरकारवर होणारी टीका जेमतेम शांत होत असतानाच राज्याला हा दुसरा मोठा दणका बसला आहे. महाराष्ट्रातले उद्योग प्रकल्प गुजरातला का पळवले जात आहेत असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे.
राज्यातील शिंदे सरकार राज्याचे हित जपण्यात अजिबात उत्सुक नसल्याची टीका माजी मंत्री अदित्य ठाकरे यांनी केली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की, गुजरात मधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. राज्यातील गुजरातला गेलेला हा प्रकल्प 22 हजार कोटी रूपयांचा होता.
त्यातून राज्याच्या आर्थिक विकासाला व रोजगार निर्मीतीला चालना मिळाली असती असे विरोधकांचे म्हणणे आहे. तथापि आपल्या सरकारवरील आरोपांच्या बचावार्थ सत्ताधाऱ्यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकल्पाला चालना देण्यासाठी काहींही काम झाले नाही म्हणून हा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला आहे. मागच्या सप्टेंबर महिन्यातच शिंदे सरकार मधील मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रात लवकरच टाटा – एअरबस कंपनीचा 22 हजार कोटी रूपयांचा प्रकल्प सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. पण हा प्रकल्प आता गुजरातला गेला आहे.
या आधी राज्यातील वेदांत प्रकल्पाबरोबरच बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्क हे प्रकल्पही गुजरातला नेण्यात आले आहेत. राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवण्यासाठीच राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आणण्यात आल्याचा आरोप विरोधक करीत आहेत.
केवळ आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण – उदय सामंत
एयरबस प्रकल्पावरून जो गाजावाजा करण्यात येत आहे. मला आश्चर्य वाटते आहे की, एका ट्वीटवरून जयंत पाटील असतील किंवा इतर वरिष्ठ नेते असतील, अशा प्रकारची प्रतिक्रिया देत आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्रात होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असं मी बोललो होतो. यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्नही केले. मात्र, पुढे अशी माहिती आली की 21 सप्टेंबर 2020 ला या प्रकल्पाचा एमओयू झाला होता. त्यामुळे केवळ आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण करू नये. विरोधात असताना बैठका सकारात्मक झाल्या असं म्हणणं खूप सोप्पे असते, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.