जळोची (पुणे) –जीएसटी लागू करण्याबाबत मनमोहनसिंग सरकारच्या काळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जीएसटीवर सर्वाधिक हल्ला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी केला होता; मात्र आज जीएसटीबाबत त्यांची भूमिका भिन्न झाली आहे. जीएसटीतून अधिक उत्पन्न मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे; मात्र त्याचा थेट परिणाम सर्वच व्यवसायांवर झालेला दिसत आहे, असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले.
बारामती मर्चंटस असोसिएशनच्या वतीने दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी शरद पवार यांच्या मार्गदर्शनपर भाषणाचे आयोजन केले जाते. यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या मनोगतातून जीएसटीबाबत नाराजी व्यक्त केली. हाच धागा पकडत पवार यांनी कर रचनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. सध्या सोन्याच्या खरेदीवर 38 टक्क्यांपर्यंत, वाहनखरेदीवर 40 टक्क्यांपर्यंत कर लावला जातो.
महाराष्ट्र ऑटोमोबॉईल हब आहे, या माध्यमातून रोजगारनिर्मिती तर होतेच; पण त्याबरोबर अनेक लघुद्योगही चालतात, यामुळे हा कर या सर्वांवर परिणाम करणारा ठरत आहे, अशी चिंता पवारांनी व्यक्त केली. व्यापार वाढवायचा असेल तर राज्य व केंद्राचे धोरण पूरक हवे, प्रोत्साहनात्मक हवे, चांगले वातावरण तयार करायला हवे, असेही पवार म्हणाले.
भारतीय काहीही करू शकतात –
आज जर्मनी व अमेरिकेत काही कंपन्या संकटामुळे बंद पडलेल्या आहेत. ही संधी समजून आपण काहीतरी पावले उचलायला हवीत. भारतीय वंशाचे इंग्लंडच्या पंतप्रधानपदापर्यंत मजल मारु शकत असेल तर आपण भारतीय काहीही करु शकतो, या जिद्दीने काम करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.