नवी दिल्ली – पंजाबमधील ‘आप’सरकारने मोफत वीज देण्याचे पहिले निवडणूक आश्वासन पूर्ण केले आहे. त्याचा संदर्भ देत या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की आम्ही इतर पक्षांप्रमाणे खोटी आश्वासने देत नाही. दिलेली आश्वासने आम्ही प्रामाणिकपणे पाळतो.
पंजाबात तीनशे युनिट मोफत देण्याचा आज झालेला निर्णय ही त्यांचीच ग्वाही आहे असेही त्यांनी म्हटले आहे. पंजाब सरकार प्रगती साधण्यासाठी राज्यातील भ्रष्टाचार संपवून त्यातून मोठा निधी वाचवेल असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. मोफत वीजेच्या निर्णयाबद्दल त्यांनी भगवंत मान यांच्या सरकारचे अभिनंदनही केले आहे.
दरम्यान या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा भार येणार असून तो भार कमी करण्यासाठी राज्य सरकार औद्योगिक वापराच्या वीजेचे दर वाढवील अशी शक्यता काही जणांनी बोलून दाखवली होती. पण ती भीती निराधार असल्याचे मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले आहे.
चंदीगड येथील एका कार्यक्रमात संबोधित करताना, मुख्यमंत्री मान यांनी औद्योगिक ग्राहकांसाठी वीज दरात कोणतीही वाढ होणार नाही,आणि शेतकरी समुदायाला मोफत वीज चालूच राहील असे स्पष्ट केले आहे.