राजगुरुनगर (प्रतिनिधी) : खेड तालुक्याचे नंदनवन असलेल्या भोरगिरी परिसरातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. या भागात जून महिन्यात झालेल्या पावसामुळे भोरगिरी परिसरातील सर्व धबधबे स्वच्छ व सुंदर पाण्याने ओसंडून वाहत आहेत. दाट धुके… फेसाळणारे धबधबे… सर्वदूर हिरवेगार वातावरण असे दृष्य दरवर्षी अनुभवण्यासाठी वर्षाविहारानिमित्त नागरिक निसर्गरम्य खेड तालुक्यात पावसाळ्यात मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, यंदा करोनामुळे वर्षाविहाराला ‘ब्रेक’ लागला असल्याने हा परिसर ओस पडला आहे.
पर्यटक येत नसल्याने स्थानिकांचा मोठा रोजगार बुडाला आहे. सध्या या भागात पाऊस कमी असल्याने निसर्ग सौंदर्य अजूनच खुलले आहे. निसर्गाचे वरदान असलेल्या भोरगिरी परिसरात पावसाळ्यात नेहमीच संततधार पाऊस असतो.
भोरगिरी परिसरातील उंच उंच धबधबे, दाट धुके, पावसाच्या सरी आणि हिरवागार परिसर शहरी पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. राज्यातील महाबळेश्वर आणि लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र त्याचबरोबरीने पर्यटकांना अत्यंत सुरक्षित असा भोरगिरी परिसर आहेत.
मात्र गेली दोन वर्षांपासून करोनाचे संकट आल्याने हा परिसर पर्यटनासाठी बंद आहे. या भागातील नागरिकांचा यामुळे मोठा रोजगार बुडाला आहे. तर हौशी पर्यटकांसह सहकुटुंब वर्षा विहार करणाऱ्यांना या मेजवानीचा फायदा घेता येत नाही. करोनाचे संकट असल्याने यावर्षीही प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.
भोरगिरी येथील एन्जॉय धबधबा, हरामीचा धबधबा, भोरगड धबधबा, नेकलेस धबधबा, मोरोशी, पाभे, धुवोली, खरपुड, येळवळी, मंदोशी, कारकुडी, भिवेगाव आव्हाट या परिसरातील धबधबे आहेत. मात्र या भागात पावसाने उघडीप दिल्याने नेकलेस धबधबा आणि इतर काही छोटे धबधबे बंद आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेले एन्जॉय धबधबा, हरामीचा धबधबा, भोरगड धबधबा, येळवळीचा धबधबा मात्र पांढऱ्या शुभ्र पाण्याने खळखळून वाहत आहे.