पुणे – यंदा पावसाचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे शेती तसेच पिण्याच्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. मात्र, त्याच वेळी नव्या बांधकामांना परवानगी दिली जात आहे. या बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यात येत आहे? ही बाब लक्षात घेता तसेच वाढलेले प्रदूषणही पाहता शहरातील बांधकामे काही महिन्यांसाठी थांबवा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रश्नावर सुळे यांनी शुक्रवारी महापालिकेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक विशाल तांबे, सचिन दोडके तसेच काका चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मतदारसंघातील कचरा, पाणी, स्वच्छता, रस्ते, वारजे रुग्णालय यासह इतर विषयांवर सुळे यांनी आढावा घेतला.
दरम्यान, दोन वर्षांपासून नगरसेवक नसताना महापालिका मात्र केवळ कोट्यवधीचे प्रकल्प मंजूर करत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास त्यांना वेळ नाही, अशी टीकाही सुळे यांनी यावेळी केली. सुळे म्हणाल्या, मनपा प्रशासनाने पाण्याबाबत दिलेली माहिती गंभीर आहे. शहरातील कचरा, पाणी, स्वच्छता या समस्या गंभीर होत आहेत. आहे त्या स्थितीमध्ये सर्वांना पाणी देणे अवघड आहे असे प्रशासनच कबूल करत आहे. मी विकासाच्या विरोधात नाही, पण सध्याची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे पुण्याच्या पाणी वापराचे नियोजन कसे असणार? याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला द्यावी. अन्यथा आम्ही महापालिकेला घेराव घालू, असा इशारा सुळे यांनी दिला.
केंद्र शासनावर पुन्हा टीका…
राज्यातील व्यावसाय बाहेर जात असून ते थांबवण्यासाठी सरकाला वेळ नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना पक्ष फोडून मराठी माणसांचे दिल्लीतील महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्राचे नुकसान करण्याचे काम दिल्लीतून सुरू आहे. पुण्यातून फॉक्सकॉन प्रकल्प बाहेर गेला. मुंबईतील हिऱ्याचा मोठा व्यवसाय शरद पवार हे मुख्यमंत्री असताना “बीकेसी’मध्ये स्थिरावला होता. पण आज हा व्यवसाय गुजरातला गेला. त्यामागे दिल्लीतील अदृश्य शक्तीचे हात आहेत, अशा शब्दांत सुळे यांनी टीका केली.