सातारा -शहरालगतच्या गोडोली उपनगरात गुरूवारच्या पावसात रस्त्यावरुन पाणी वाहून दुकानांमध्ये पाणी शिरले. येथील त्रिशंकू भागात शगुन बेकरीत पाणीच पाणी झाले. या परिसरातील सुळाच्या ओढ्यातील अतिक्रमांमुळे मोठ्या पावसानंतर दरवर्षी पुराचा धोका येथे उदभवत आहे.
उंटाचा डोंगरालगतच्या परिसरात गोडोली उपनगर वसले आहे. सुळाच्या ओढयावर शिवनेरी कॉलनी ते बागडी वस्ती दरम्यान झालेल्या अतिक्रमणांचा परिणाम गोडोलीच्या साई मंदिर चौकात दिसून आला. साई मंदिर ते कल्याणी शाळेच्या मैदाना दरम्यान रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. मोठया वाहनांना व दुचाकींना पाण्यातून मार्ग काढतांना मोठी कसरत करावी लागली.
साईबाबा मंदिराच्या पिछाडीला असणाऱ्या कॉलनीत व मंदिरातील चौकात असणाऱ्या बेकरीसह इतर दुकानांमध्ये पाणी शिरले. अवकाळी पावसाच्या तडाख्यात गोडोलीत आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले. गोडोली जकात नाक्याकडून त्रिमूर्ती कॉलनी व इतर अठरा वसाहतींना कळंबीच्या ओढ्याने जखडले आहे. हॉटेल पायरी प्लाझाच्या पिछाडीला पुन्हा या ओढ्याचे पाणी पात्राच्या बाहेर पडले. या रस्त्यावर सर्वत्र दलदल झाली. त्रिमूर्ती कॉलनीतल्या सखल भागातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याचे स्पष्ट झाले.
गोडोली तलावाला येऊन मिळणाऱ्या कळंबीच्या ओढ्यावरसुद्धा खासगी मिळकती व दुकानाची अतिक्रमणे झाल्याने शिवनेरी कॉलनी, यशवंत कॉलनी, जगताप वाडी, गोडोली गावठाणातल्या जुन्या वस्त्यांमध्ये पाणी घुसण्याचे वेळोवेळी घडत आहेत. कल्याणी शाळेनजीकच्या ओढयांमध्येसुध्दा कचरा टाकला जात असल्याने ओढ्याचे पात्र आकसले आहे. येथे गुरूवारी अचानक ओढ्याचे पाणी वाहून रस्त्यावर आले होते. गोडोलीत आपत्ती व्यवस्थापनाचा पेच मोठा असल्याने गेल्या कित्येक वर्षात येथील पूरसदृश्य परिस्थितीवर तोडगा निद्यालेला नाही.
गोडोलीत पालिकेचे कर्मचारी फिरकलेच नाही
लॉकडाऊनच्या काळातही सातारा पालिकेने आगामी पावसाळ्याच्या तोंडावर युद्धपातळीवर नालेसफाई हाती घेतली होती. या वार्डाचे नगरसेवक शेखर मोरे पाटील यांनी सुळाचा व कळंबीच्या ओढ्याच्या स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, विरोधकांचा वार्ड म्हणून हा भाग कायम दुरलक्षित राहिला आहे. ज्या भागात पूरसदृश्य परिस्थितीचा धोका जास्त आहे, त्याच भागात आरोग्य विभागाने कागदी घोडे नाचवण्याचे काम केले आहे