पुणे – वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल-दुरुस्तीचे काम पालिकेने नियोजित वेळेत पूर्ण केले नाही. त्यामुळे सिंहगड रस्ता, कात्रज तसेच कोंढवा परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा बंद होता. याचा फटका सुमारे सहा लाख नागरिकांना बसला. दरम्यान, शुक्रवारी दुपारनंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, पाणी उशिरा येण्याबाबत मनपा पाणी पुरवठा विभागाने नागरिकांना कोणतीही सूचना दिली नव्हती. शिवाय, सलग दोन दिवस पाणी बंद ठेवले, यामुळे प्रशासनावर टीकेचा भडिमार होत आहे.
महापालिकेने गुरुवारी (दि.13) वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग स्टेशन येथील विद्युत-पंपिंग आणि स्थापत्यविषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम नियोजित होते. त्यामुळ संबंधित सर्व भागांमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यानुसार गुरूवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. मात्र, येथील दोन व्हॉल्व नादुरुस्त असल्याचे रात्री लक्षात आले. त्यामुळे तंत्रज्ञांनी या दोन्ही व्हॉल्वचे काम हाती घेतले. हे काम सकाळी 9 वाजेपर्यंत संपेल, असा अंदाज होता. मात्र, त्यासाठी शुक्रवारी दुपारचे तीन वाजले. त्यामुळे दुपारी तीन नंतर पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.
या भागाला बसला फटका
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग-2 वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर.
पालिकेच्या कारभारावरच संशय
महापालिकेने पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागांत अशाच प्रकारे पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. मागील महिन्यात गुरुवारी पाणी बंद ठेवल्यानंतर नगर रस्ता भागात तीन दिवस दुरुस्तीच्या नावाखाली पाणी बंद ठेवण्यात आले. हाच प्रकार पर्वती जलकेंद्राबाबत सुरू आहे. त्यामुळे महापालिका जाणून-बुजून हा प्रकार करते का? असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
ठोस उत्तर न देण्याचे कारण काय?
पाणी न आल्याने अनेक नागरिक महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधतात. मात्र, प्रत्येक वेळी नागारिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. पाण्यासारख्या विषयात पालिकेचे कर्मचारी असंवेदनशील भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.