आंबेगाव, शिरूर तालुक्यातील 55 गावांना फायदा
मंचर – हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) येथून उजव्या कालव्याला पाणी सोडले असल्याने उन्हाळी हंगामातील विविध पिकांना फायदा होणार आहे. आंबेगाव आणि शिरुर तालुक्यांतील सुमारे 55 गावांना पाण्याचा फायदा होणार आहे.
हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) येथून कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्याचा उपयोग शेती पिकांना होणार आहे. घोडनदीवर असणाऱ्या हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) येथून उजव्या व डाव्या कालव्याद्वारे सोडलेल्या पाण्याचा उपयोग आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना होणार आहे. डिंभे उजव्या कालव्यातून आंबेगाव-शिरूर तालुक्यांना पाणी जाते, तसेच डाव्या कालव्यातून घोडनदीच्या उत्तरेकडील भागाला पाणी जाते. पाऊस उघडल्यानंतर कालव्याला सोडण्यात आलेले दुसरे आवर्तन आहे. या पाण्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत शेती पिके शेतकऱ्यांना घेता येणार आहेत.
सध्या नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरलेले असले तरीही उजव्या पाटाकडेच्या गावाला पाण्याचा तुटवडा जाणवू लागला होता, त्यामुळे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे येथील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने धरणही पूर्ण क्षमतेने भरले होते. पाण्याचे योग्य नियोजन व योग्य वापर करणे गरजेचे आहे, अशी माहिती शाखा अभियंता डी. एस. कोकणे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शंकर बांगर यांनी दिली.