नगर – वारंवार चर्चा होऊनही अनेक गावांमध्ये पाणी निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारी टीसीएल पावडर निकृष्ट असल्याने जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवाशी एकप्रकारे खेळच सुरु आहे. त्यातच दूषित पाण्यामुळे आजारांमध्ये वाढच होत आहे.जिल्ह्यातील 106 गावांमध्ये सद्यस्थितीत दूषित पाण्याच्या पुरवठा होत आहे. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व वरिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यांच्या मासिक अहवालातून ही आकडेवारी उघड झाली आहे.
दूषित पाण्याद्वारे विविध प्रकारचे आजार पसरतात. दूषित पाणी पिल्याने नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होत असतो. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व ग्रामपंचायत या दोन विभागावर जिल्ह्यात स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागानेही याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असताना या दोन्ही सरकारी यंत्रणांच्या चालढकल कारभाराचा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द पाणी मिळावे यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना राबविण्यात येतात. परंतु जलस्रोत व पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांना अशुद्ध पाणी मिळते.
अद्यापही 10 टक्के गावातील लोकांना अशुद्ध पाणी मिळत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. पाणीपुरवठा, ग्रामपंचायत विभाग व आरोग्य यंत्रणा यांच्यातील असमन्वय दूषित पाणीपुरवठ्याला कारणीभूत आहे. 20 टक्के पेक्षा कमी क्लोरीन असलेली टीसीएल पावडर ही निकृष्ट समजली जाते. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पाणी निर्जंतुकीकरणासाठी निकृष्ट पावडर वापरून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे.
या गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा
नगर (बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, धनगरवाडी, डोंगरगण, मांजरसुंबा, रुईछत्तीसी, साकत), अकोले (कातळापूर, तेरुंगण सरोवर, माळेगाव, केळूगण, भंडारदरा, गुहिरे, सांगवी, केळी, रुम्हणवाडी, चैतन्यपूर, कळंब, करंडी, मनाळे, वीरगाव, देवठाण, खेतेवाडी, येरासाठाण, घोटघरवाडी, जामगाव, घिगेवाडी, शेलद, औरंगपूर, धुमाळवाडी, ताभोळ, अकोले, कुंभेफळ,सुगाव खु.), कोपरगाव (वेससोयगाव, चांदेकसारे), पाथर्डी (कोनोशी, कळसपिंप्री, नि. जळगाव, कारेगाव, चितळवाडी, करोडी, हनुमान टाकळी, सातवड, माळेवाडी).