मोठा कांदा शंभर रुपये, तर चिंगळी ऐंशी रुपये
आळंदी-कांद्याचे भाव गगनाला भिडले असून गृहिणींसह सामान्य नागरिकांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणल्याचे चित्र आहे. रोजच्या आहारातील कांदा खरेदीसाठी आवश्यक असल्याने ग्राहकांना नाइलाजाने जादा दर देत कांदा खरेदी करावा लागत आहे.
आळंदी येथील भाजी मंडईत महागलेल्या कांद्यावर चिंगळ्याचा नामी उपाय शोधला आहे. बाजारात भाव नसल्याने शेतकरी घरी खाण्यासाठी चिंगळ्या ठेवत असतो व मोठे कांदे बाजारात विक्री करत असतो. चिंगळ्या बाजारात व्यापारीदेखील विकत घेत नाही. यामुळे त्या सहसा घरीच खाण्यासाठी ठेवल्या जातात. आता मात्र या चिंगळ्यांना देखील भाव आला असून आळंदीत या चिंगळ्या तीस ते पन्नास रुपये किलोने विकल्या जात आहेत. म्हणजे कांद्याच्या सध्याच्या दराच्या निम्म्या दराने. सध्या कांदा ऐंशी ते शंभर रुपये, तर चिंगळ्या तीस ते पन्नास रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याबरोबरच भाज्यांचे दर देखील गगनाला भिडले आहेत. ओल्या दुष्काळाचा हा फटका आता जाणवू लागला असून काही दिवसातच परस्थिती गंभीर होण्याचे चित्र आहे. मंडईत भाज्यांचे भाव कडाडले असून दहा ते वीस रुपये किलो असणारे दर थेट पन्नास ते साठ रुपयांवर पोहचल्याने सर्वसामान्य नोकरदार वर्ग, कामगार वर्ग हवालदिल झाला आहे. या चढ्या दरांचा ना शेतकऱ्यांना फायदा ना विक्रेत्यांना अशी अवस्था आहे.
यापूर्वी पगार लांबल्याने, कामात ब्रेक मिळाल्याने, रोजगार बुडाल्याने मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना “दुष्काळात तेरावा महिना’ अनुभवावा लागत आहे. यावर शासनाने मार्ग काढत भाज्यांचे भाव सर्वसामन्यांच्या आवाक्यात येतील, यासाठी पाऊले उचलण्याची गरज आहे. ठोक व किरकोळ विक्री होत असलेल्या ठिकाणी असे दर आहेत. तर भाजी मंडई, सोसायटी लगतचे भाजी विक्रेते यांच्याकडील भाव याहीपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे. यामुळे एका दिवसाच्या भाजीसाठी चार लोकांच्या कुटुंबाला पाचशेची नोट मोजावी लागते आहे. सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणींच्या डोळ्यांत यामुळे ठराविक रक्कमेत महिन्याचा खर्च भागवताना पाणी येत आहे.
- आवक मंदावल्याने सर्वच भाज्या महाग
बाजारात शेतमालाची आवकच मंदावली असल्याने आहे तो माल जादा दराने विक्री केला जात आहे. यामुळे मागणी जास्त पुरवठा कमी अशी अवस्था आहे. मेथीची एक जुडी तीस ते चाळीस रुपयांना विक्री जात असून कोथिंबीर, शेपूदेखील दरात मागे नसल्याचे दिसून येत आहे. त्यादेखील तीस ते चाळीस, पन्नासच्या आसपास प्रतिगड्डी दराने किरकोळ विक्री केली जात आहे. भेंडी, भोपळा, वांगी, गवार यांचे दर देखील भडकले असून पन्नास ते साठ रुपये शिवाय खालच्या दरात भाज्याच उपलब्ध होत नसल्याने गरीब कुटुंबांना एका दिवसाच्या जेवणाच्या खर्चासाठी दुपटीने पैसे मोजावे लागत आहेत.