लोणी काळभोर (वार्ताहर) – मागील 9 वर्षांपासून बंद पडलेल्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या शासकीय शिक्षणशास्त्र पदविका महाविद्यालय (डीएड महाविद्यालय/बेसिक सेंटर) परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. भुरट्या चोरांनी इमारतीच्या दरवाजांचे कडी-कोयंडे देखील उचकटून चोरुन नेले आहेत. परिणामी धूळ खात बंद पडलेले हे ज्ञानमंदिर भुरट्या चोरांचा व मद्यपींचा अड्डा बनला आहे.
लोणी काळभोर येथील शासकीय शिक्षणशास्त्र पदविका महाविद्यालयाची स्थापना 1948 साली करण्यात आली होती. हे विद्यालय साडेसात एकरात पसरले असून या ठिकाणी वसतीगृहे व शिक्षकांना राहण्यासाठी सुसज्ज इमारती बांधण्यात आल्या आहेत. येथून तब्बल 60 वर्षांहून अधिक काळ ज्ञानदानासारखे पवित्र काम केले जात होते.
या ज्ञानमंदिरातून अनेक आदर्श व सुसंस्कृत पिढ्या घडल्या आहे; मात्र मागील 9 वर्षांपूर्वी हे महाविद्यालय बंद पडले आहे. महाविद्यालय सन 2015 साली बंद पडल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाकडून कोणतेही विशेष प्रयत्न झाले नाहीत. इमारतीच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक केलेली नाही.
शिवाय हे महाविद्यालय पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन ऑइल व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या मधून गेलेल्या रस्त्यावर महामार्गापासून 500 मीटर अंतरावर आहे.
आडबाजूला असल्याने महाविद्यालय व परिसरात भुरट्या चोरांनी व मद्यपींनी बस्तान बसवले आहे. वर्गखोल्या, कार्यालये, ग्रंथालय, स्वच्छतागृहे व मैदानात बिअर व दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसून येत आहे. तरुण अंधाराचा गैरफायदा घेत गांजा, सिगारेट, मद्यप्राशन करत आहेत.
चोरट्यांनी महाविद्यालयातील खोल्यांचे दरवाजे, चौकटी, कडी-कोयंडे, खोलींवरील पत्रे, हातपंपाचे दांडके देखील चोरून नेले आहेत. भिंतीवरील महापुरुषांच्या प्रतिमा धुळकट झाल्या आहेत. यामुळे सध्या या पवित्र शिक्षणमंदिराच्या इमारतीची भयावह अवस्था झाली आहे.
अपर तहसील कार्यालय विचाराधीन
लोणी काळभोरचे अपर तहसीलदार कार्यालय या ठिकाणी होणार असल्याची चर्चा मध्यंतरी सुरू होती. यासाठी या जागेचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती मिळत आहे; मात्र या प्रस्तावावर अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती मिळत आहे. येथे तहसिल कार्यालय झाल्यास इमारतीचा वापर योग्य कारणासाठी होईल आणि विद्रूपीकरण थांबेल असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
या विद्यालयातील 3 विद्यार्थी पोलीस उपअधीक्षक, 15 ते 20 विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक तर 5 ते 7 जण शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या विद्यालयाची परिस्थिती सुन्न करणारी आहे. या विद्यालयात 24 वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले असल्याने या ठिकाणी नाळ जोडली गेली आहे. या ठिकाणी लवकरात लवकर शासकीय कार्यालय सुरु होऊन नागरिकांना सुविधा मिळाव्यात. त्यामुळे या विद्यालयाशी जोडलेल्या आठवणी पुन्हा ताज्या होतील. -प्रा. कालिदास काळे, तत्कालीन शिक्षक