पुणे -खराडी-चंदननगर भागांतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेकडून 10 जून पासून या भागात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र, या नियोजनामुळे या भागातील पाणी पुरवठा आणखीच विस्कळीत झाल्याने महापालिकेच्या या निर्णयास स्थानिक नागरीक तसेच लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे, महापालिकेने दिवसाआड पाण्याचे नियोजन रद्द केले आहे. आता, या दोन्ही भागात आता पूर्वी प्रमाणेच दररोज पाणी येणार आहे.
शहरा प्रमाणे या भागातही आज (गुरूवारी) पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. महापालिकेने शहरात दि.18 मेपासून आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या पाणी बंदनंतर काही भागांत पुढे दोन ते तीन दिवस अतिशय कमी दाबाने तसेच कमी पाणी येत असल्याने महापालिकेने दोन आठवड्यांपूर्वी सिंहगड रस्ता आणि कात्रज भागांतील पाण्याचे नियोजन बदलले होते. त्यानंतर, चंदननगर-खराडीत पाणी पुरवठा दिवसाआड केला होता. त्यानंतर या भागात पाणीच न मिळाल्याने प्रशासनाने अखेर आपला निर्णय बदलत पूर्वी प्रमाणेच पाणी पुरवठयास सुरूवात केली आहे.
आज पाणी बंद
या भागात शहरातील इतर भागा प्रमाणेच पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याने आज( गुरूवारी) चंदननगर आणि खराडी परिसरातील पाणी पुरवठाही बंद असणार आहे. शुक्रवारपासून पुन्हा नियमित पाणी दिले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट् करण्यात आले.