पुणे शहरातील विठ्ठल मंदिरांचा इतिहास पाहताना एका आगळ्यावेगळ्या; पण प्राचीन मंदिराची दखल घेणे महत्त्वाचे वाटते. त्यामुळे या विठ्ठल मंदिरांच्या मालिकेत आळे येथील रेडा समाधी मंदिराचा समावेश केला आहे. माऊलींनी वेद ज्याच्या तोंडून वदवले त्या रेड्याचे मंदिर जुन्नर तालुक्यातील आळे येथे आहे. संतांनी जीव-शिव एक मानले असताना मनुष्य आणि प्राणी यांच्यातही भेद केला नाही. द्वैत-अद्वैताचा अंगीकार करताना प्रत्येक आत्मा एक आहे, याची प्रचिती त्यांनी दिली आणि माऊलींनी तर साक्षात्कार घडवून आणला.
आळे येथील रेडा मंदिराच्या बांधकामाला शके 1784 सुरुवात करण्यात आली आणि मंदिर शके 1785 पूर्णत्वास आले. हे बांधकाम कै. आनंदराव भिकाजी शेटे यांनी सुरू केले आणि त्यांचे सुपूत्र कै. रघुपंतराव शेटे यांनी पुरे केले. याच घराण्यातील भालचंद्र रघुपंतराव शेटे यांनी शके 1876 फाल्गुन शुद्ध पंचमी दि. 27 फेब्रुवारी 1955 रोजी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येथे केली.
चैत्रात यात्रा अन् पैलवानांचा आखाडा
चैत्र वैद्य एकादशीला देवाची तीन दिवस यात्रा भरते. दुसऱ्या दिवशी सगळ्या वारकऱ्यांना द्वादशीचे अन्नदान संतवाडी, कोळवाडी व डावखरवाडी यांचेकडून करण्यात येते. त्यानंतर दुपारी महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांचा आखाडा गाजतो व शेवटच्या दिवशी दहीहंडी फोडून यात्रेची सांगता होते.
मंदिराचा भौगोलिक इतिहास
आळे गाव हे पुणे नाशिक हायवेवरून 3 कि. मी. अंतरावर असून, विशाखापट्टणम कल्याण हायवे नं. 222 वरुन 2 कि. मी. अंतरावर रेडासमाधी मंदिर आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूला कोळवाडी गाव असून मंदिराच्या उत्तरेला संतवाडी गाव आहे. मंदिराच्या पूर्वेला ग्रामदैवत कानिफनाथाचा डोंगर आहे आणि पश्चिमेला आळेफाटा हे व्यापारी क्षेत्र असलेले पुणे-नाशिक हायवेवरचे ठिकाण आहे.
येऊनिया उतरिले
आळेचिये बनी।
पशु तये स्थानी
शांत जाहला।।
संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आळे येथील समाधी स्थानाचे हे वर्णन त्यांच्या अभंगामध्ये केले आहे. आळंदीच्या धर्ममार्तंडानी श्री ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या भावंडांना धर्मात परत घेण्यासाठी प्रमाण म्हणून पैठण येथील धर्मसभेचे शुद्धीपत्र मागितल्याने ही भावंडे पैठण येथील धर्मसभेमध्ये गेली असताना त्यांना अनेक सत्वपरीक्षांना तोंड द्यावे लागले. त्याचवेळी वाकोबा नावाचा कोळी त्याच्या गेनोबा नावाच्या रेड्यास तेथून घेऊन जात असताना धर्मसभेतील एका पंडिताने ज्ञानेश्वर महाराजांना “त्या रेड्याचा अन् तुझा आत्मा एकच आहे का हे सिद्ध करुन दाखव’, असे सांगितले. त्यावर ज्ञानदेवांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून वेद उच्चारण्याची आज्ञा केली अन् रेड्याच्या मुखातून ऋगवेदाच्या श्रृती बाहेर पडल्या.
समाधीस्थान
नेवासा येथे ज्ञानेश्वरीचे लेखन केल्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताई, रेडा व वाकोबा कोळी हे सर्व बरोबरच्या संतासमवेत आळे गावच्या उत्तरेस असलेल्या अकलापूर या गावी आले. तेथून संतवाडी येथील चौऱ्याच्या डोंगरावरती विसावा घेत असताना समोर दिसणाऱ्या भूमीचे निरीक्षण करताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वर्तुळाकार अशी निसर्गसंपन्न भूमी पाहून या भूमीचे आळे असे नामकरण केले. या ठिकाणी रेड्याने श्री ज्ञानेश्वर महाराजांकडे याच ठिकाणी त्याला समाधी द्यावी अशी इच्छा प्रदर्शित केली आणि ज्ञानदेवांनी शके 1212 (इ. स. 1290) माघ वद्य 13 (त्रयोदशी) या दिवशी स्वहस्ते या रेड्यास येथे समाधी दिली.
या समाधीला श्री ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपनदेव, मुक्ताई या चार भावंडांचे हात लागलेली महाराष्ट्रातील ही एकमेव समाधी आहे. ही समाधी अत्यंत प्राचीन असुन वारकरी सांप्रदयामध्ये या तीर्थक्षेत्राला अत्यंत महत्त्व असून आळंदी, पंढरपूर खालोखाल वारकरी सांप्रदयात या तीर्थक्षेत्राची गणना केली जाते. ज्या वारकऱ्यांची पंढरपूर आळंदीची वारी चुकते ते वारकरी आळ्याची वारी करतात. रेड्याच्या समाधीस्थळी आजपर्यंत अखंड जळणारा नंदादीप, अखंड विणापूजन, अभिषेक, आरती, हरिपाठ, यज्ञयाग, अन्नछत्र, भजन, जागर, कीर्तन, भारुड इ. धार्मिक कार्यक्रम होतात. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक शुद्ध व वद्य एकादशीला दर्शनासाठी येत असतात. प्रत्येक एकादशीला व द्वादशीलाभाविक येथे अन्नदान करतात.