वाशीम- शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख हरीश सारडा यांनी खासदार भावना गवळी यांच्याकडून जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे येथील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. हा घोटाळा उघडकीस आणल्यापासून सारडा यांना धमक्यांचे फोन येत असल्याचे त्यांनी आरोप केले आहे.
हरीश सारडा म्हणाले की, गवळी यांनी वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील शंभर कोटी रुपयांचा श्री बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखाना २५ लाख रुपयात खरेदी केला. त्यांचे खासगी सचिवांच्या भावना अॅग्रो प्रॉडक्ट अॅण्ड सर्व्हिसेसच्या नावावर हा व्यवहार झाला.
हा घोटाळा उघडकीस आणल्यापासून धमक्यांचे फोन येत आहेत. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही अद्याप कारवाई झाली नाही. पोलिसांची खासदारांना साथ लाभली आहे. त्यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भावना गवळी यांनी भेट घेतल्यानंतर सारडा यांनी थेट नागपूर गाठून पत्रकार परिषद घेतली. माझ्यावर यापूर्वीही दोन वेळा हल्ले झाले. धमकी देण्यात येत आहे. पोलिसांनी सुरुवातीला संरक्षण दिले आणि नंतर काढून घेतले. पोलिस उपअधीक्षकांनी मोबाइल जप्त केला. असेहीते म्हणाले आहेत.