कर्जत(प्रतिनिधी) -कर्जत तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची टंचाई जाणवत आहे. छोटी लोकवस्ती असलेल्या खंडाळा गावात अनेक दिवसांपासून महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यंदा टंचाई असतानाही गावात पाण्याचे टॅंकर आलेले नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षीचे पाण्याचे टॅंकर फक्त निवडणूकीपुरतेच होते की काय? अशी चर्चा गावात सुरू आहे.
खंडाळा हे जेमतेम शंभर-दीडशे घरे असलेले दुष्काळी गाव. गावातील 70 टक्के लोक हे मजुरी करण्यासाठी पुणे, तसेच इतरत्र गेलेले असतात. सध्या शहरांत करोनाची गंभीर परिस्थिती उद्भवल्याने घाबरून अनेक लोक गावी परतलेले आहेत. मात्र येथे पाण्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांचे हाल सुरू आहेत. पाण्याच्या टंचाईमुळे महिलांचे सर्वांत जास्त हाल होत आहेत.
सार्वजनिक विहिरींवरील पाणी पुरत नसल्यामुळे रात्री-अपरात्री लोकांची पाणी भरण्यासाठी गर्दी होत आहे. या सार्वजनिक विहिरीची पाणी पातळीही खूपच खालावली आहे. गावातील विहिरींनी तळ गाठल्याने ग्रामस्थांना गाळयुक्त पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.
अनेक लोक शेतात असलेल्या दीड-दोन किलोमीटर अंतरावरील विहिरीतून पाणी भरत आहेत. मात्र सध्या टंचाईची परिस्थिती असूनही एकही टॅंकर सुरू झालेला नाही. त्यामुळे मागील वर्षी फक्त निवडणुकीपुरतेच टॅंकर सुरू होते की काय, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित होत आहे.