सातारा – उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहणे आवश्यक असल्याने उरमोडी धरणामधून कोणत्याही क्षणी नदीपात्रात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उरमोडी नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कोसळत असून महाबळेश्वर तालुक्यात 73.33 मिलिमीटर तर आत्तापर्यंत 646.83 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांना अद्याप पावसाने हुलकावणी दिली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे आणि गुरुवारी दिवसभरात एकूण 192.17 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत एकूण सरासरी 20.28 मिलिमीटर पाऊस झाला.
जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 29.62 (180.86), जावळी- 22.62 (272.26), पाटण- 56.91 (285.09), कराड- 23.23 (158.62), कोरेगाव- 6.89 (112.00), खटाव- 2.31 (122.49), माण- 00 (55.43), फलटण- 0.00 (56.78), खंडाळा- 4.05 (64.30), वाई- 4.51 (159.17), महाबळेश्वर- 73.88 (646.83).
उरमोडी धरण परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणाच्या वरील व खालील बाजूच्या नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन उरमोडी सिंचन व्यवस्थापनाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी केले आहे. ज्या लोकांनी बुडीत क्षेत्रामध्ये अतिक्रमणे केली असतील त्यांनी ती काढून घ्यावीत. बुडीत क्षेत्राजवळ नदीकाठी जनावरे घेऊन जाऊ नये, नदीकाठी असणारे विद्युत पंप काढून ठेवण्यात यावेत, असे आवाहनही उरमोडी सिंचन व्यवस्थापन उपविभागातर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांनी केले आहे.