वर्धा : राज्यातील 147 बाजार समित्यांसाठी काल मतदान पार पडले. त्यापैकी 95 बाजार समित्यांची आज मतमोजणी पार पडणार आहे. तर काही ठिकाणी आज मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच देवळी तालुक्यातील पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस, सहकार गट प्रणित संपूर्ण पॅनल निवडून आले. म्हणजेच देवळी बाजार समितीवर काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे.
या निवडणुकीत भाजपाचा सुपडासाफ झाला असून या निवडणुकीमध्ये भाजपाला खातेही उघडता आले नाही. काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी या बाजार समितीवर आपला कब्जा कायम ठेवला आहे.
पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मतदारानी पसंती दाखवली. कृषी उत्पन्न बाजार समिती देवळी पुलगावही निवडणूक काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे तसेच भाजपा खासदार रामदास तडस यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. मात्र काँग्रेस व सहकार गटाला मतदारांनी पसंती दाखवून भाजपाला नाकारल्याचे चित्र दिसून येत आहे.
सर्व अठरा जागेवर काँग्रेसचा विजय झाला आहे. या बाजारसमितीवर एकहाती मिळालेल्या विजयाचा श्रेय आमदार रणजित कांबळे यांना देण्यात आले आहे. सोबतच येत्या काळात आमदार रणजित कांबळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी आणखी चांगले काम करणार असल्याच मनोज वसू यांनी सांगितले.