सातारा, (प्रतिनिधी) – येथील ज्ञानविकास मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेला सुरुवात झाली असून व्याख्यानमालेला प्रतिसाद लाभत आहे. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. वंदना वकील कुलकर्णी पुणे यांनी गुंफले. त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता श्यामची आई काल आज आणि उद्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रकृती आयुर्वेदिक रिसॉर्टचे डॉ. सुयोग दांडेकर हे उपस्थित होते.
डॉ. वंदना बोकील आपल्या व्याख्यानात म्हणाल्या श्यामची आई हे पुस्तक म्हणजे नाशिकच्या तुरुंगात साने गुरुजींनी 1932 मध्ये मौखिक रूपाने सांगितलेले कथन आहे. श्यामची आई पुस्तकाच्या 60 पेक्षा अधिक आवृत्ती निघाल्या आहेत. 1935 मध्ये हे पुस्तक प्रसिद्ध झाले महारिणीच्या डोक्यावर मोळी उचलून द्यायला मदत कर असे श्यामला सांगणारी आई ही माणुसकीचे दर्शन घडवते.
श्याम हा अतिशय संवेदनशील आणि भावनिक आहे हे त्याची आई जाणते साने गुरुजींचे हृदय हे मातृ हृदय होतं त्यांनी शाळेमध्ये शिकवत असताना तिथल्या वसतिगृहामधील मुलांची आईच्या मायेने काळजी घेतली. श्यामची आई हे पुस्तक शहरी पांढरपेशा समाजापेक्षा खेड्यापाड्यांमध्ये जास्त वाचलं जातं त्या पुढे म्हणाल्या साने गुरुजींच्या साहित्याकडे कला आणि संस्कारवादी साहित्य या दृष्टीने पाहता येईल.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. सुयोग दांडेकर यांनी ज्ञानविकास मंडळाच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष प्रसाद चाफेकर यांनी केले गौतम भोसले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला श्याम चितळे यांनी आभार मानले.
स्वप्निल पोरे यांनी उलगडला हिंदी चित्रपट संगीताचा प्रवास
वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प पुणे येथील हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक स्वप्निल पोरे यांनी गुंफले. त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता, हिंदी चित्रपट संगीताचे सुवर्णयुग. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक, हिंदी चित्रपट गीतांचे अभ्यासक पद्माकर पाठकजी उपस्थित होते.
स्वप्निल पोरे म्हणाले, आलम आरा हा 1931 मध्ये पहिला बोलपट आला. मुलायम आणि मर्दानी स्वरांनी देवदास यांनी लोकांना गाण्याच्या माध्यमातून आपल्या आवाजाने वेडं केलं. 1941 साली गायिका शमशाद बेगम यांचा संगीत प्रवास सुरू झाला. हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगाला खऱ्या अर्थाने 1949 साली सुरुवात झाली. त्यावर्षी गायिका लता मंगेशकर यांचे नाव संपूर्ण भारतात दुमदुमायला लागलं.
बाजार, लाहोर अशा चित्रपटातील गाणी गाजली. राज कपूरचा बरसात हा संगीताच्या बाबतीत क्रांतिकारी चित्रपट म्हणावा लागेल. यातली शैलेंद्र यांची गाणी विशेष गाजली. लता मंगेशकर यांनी हिंदी चित्रपट संगीताचे सुवर्णयुग घडविण्यामागे फार मोठा वाटा उचलला आहे. हे हिंदी चित्रपट संगीताचे सुवर्णयुग 1965, 66 पर्यंत होते.
स्वप्निल पोरे यांनी अनेक हिंदी चित्रपट गाण्यांच्या जन्म कहाण्या सांगितल्या. त्यांनी लता मंगेशकर यांचे बरोबरची एक आठवण देखील सांगितली. त्यांनी लता मंगेशकर यांना प्रश्न विचारला होता की हिंदी चित्रपट संगीताचे सुवर्णयुग हे भविष्यकाळात कधी येईल का ? त्यावर लता दीदी म्हणाल्या, पृथ्वी ही गोल आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही त्याच ठिकाणी राहत नाही. ती सतत बदलत असते. त्यामुळे काहीही होऊ शकते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे पद्माकर पाठकजी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
अरुण राजहंस यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला शिरीष चिटणीस रवींद्र शिवदे, गायत्री परिवाराचे श्याम चितळे मोहन साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला श्रोत्यांचा भरगच्च प्रतिसाद मिळाला. ही वसंत व्याख्यानमाला दि. 25 मे अखेर साजरी होणार आहे.