मुंबई – मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू आहे. मलिक यांनी अनेक पोस्ट शेअर करत पुराव्यासह वानखेडे यांच्यावर आरोप केले. त्यामुळे वानखेडे कुटुंबांने मलिकांना रोखण्यासाठी कोर्टात धावा घेतली होती. मात्र कोर्टाने देखील त्यांना दिलासा दिला नाही.
आपल्या कुटुंबियांची बदनामी करण्यात येत असल्याचं सांगत ज्ञानदेव वानखडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना करताना मुंबई उच्च न्यायालयाने मलिक यांना आरोप करण्यापासून रोखण्यास नकार दिला आहे.
मलिक यांनी आतापर्यंत वानखेडे कुटुंबावर अनेक आरोप केले. वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्या संदर्भात अनेक पुरावे देखील मलिक यांनी दिले होते. तर न्यायालयात देखील या संदर्भातील पुरावे सादर करण्यात आलेले आहेत.
दरम्यान मलिक सध्या दुबईला गेलेले आहेत. मात्र तिथून देखील ते ट्विट करत आहे. समीर वानखेडे खोटे पुरावे सादर करून खंडणी गोळा करत असल्याचा आरोप देखील मलिक यांनी केला होता.