वाघोली :- कोरोना काळानंतर ऑनलाइन शाळा असल्याने इतर शालेय उपक्रम राबविले गेले नाहीत. या काळात मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला नाही, हीच बाब लक्षात घेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना शाडू मातीच्या गणेशीमूर्ती तयार करण्याच्या उद्दशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मुला-मुलींसह पालकांनीही याला मोठा प्रतिसाद दिला. यातून त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला, याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर (आबा) कटके यांनी सांगितले.
वाघोली येथील अभिषेक कार्यालय येथे “ज्ञानेश्वर कटके सोशल फाउंडेशन’च्या वतीने पर्यावरणपूरक शाडू माती गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत मुलांनी तयार केलेल्या मूर्तींचे कौतूक करताना ज्ञानेश्वर कटके बोलत होते. या कार्यशाळेत मुलांचा प्रचंड उत्साह पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मूर्ती बनविण्याबाबत तसेच रंगविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच पर्यावरणपूरक गणोशोत्सव साजरा करण्याची सवय लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजावी. या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात आला. या कार्यशाळेत विविध वयोगटातील 600 पेक्षा अधिक मुला-मुलींनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेत मूर्ती बनविण्याकरिता लागणारी शाडूची माती फाउंडेशन मार्फत पुरवण्यात आली.
याप्रसंगी माजी सरपंच वसंत काका जाधवराव, संग्राम जाधवराव, भगवानराव जाधव, अनिल सातव पाटील, कुणाल जाधवराव, पोपटशेठ दळवी, प्रशिक्षिका मीनल पुरंदरे तसेच ज्ञानेश्वर कटके सोशल फाउंडेशनचे सर्व सभासद तसेच परिसरातील अनेक मुलांसह त्यांचे पालक उपस्थित होते.