शिवसेनेतील बंडाळी कायम, तीन जागा यापूर्वीच बिनविरोध
नगर – जिल्ह्यातील विकासकामांचे नियोजन करण्यासाठी असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या मनपा गटातील दोन जागांसाठी आज,दि.24 मतदान होणार आहे. तर मतमोजणी बुधवारी,दि.26 रोजी होणार आहे.मनपाच्या या दोन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. मनपाच्या सर्वसाधारण गटात शिवसेनेच्याच उमेदवारांमध्ये लढत होत आहे. त्यामुळे शिवसेनेतील बंडाळी कायम राहिली आहे.
पाच जागांसाठी निवडणूक होणार होती.मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगरपालिका प्रवर्गातून पाच,तर महानगरपालिका प्रवर्गातून 14 जणांनी माघार घेतली. नगरपालिका प्रवर्गातून राष्ट्रवादीचे गणेश बाबासाहेब भोस यांचा एकमेव अर्ज राहिल्याने ते व मनपा प्रवर्गात महिला सर्वसाधारण गटात भाजपच्या आशा शिवाजी कराळे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने या दोन जागा बिनविरोध झाल्या. जिल्हा परिषद प्रवर्गातून राष्ट्रवादीचे धनराज शिवाजीराजे गाडे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती.
आता या मनपाच्या दोन जागांसाठी पुढील मंगळवारी,दि.24 नगर येथील महासैनिक लॉन येथे सकाळी 8 ते 5 या वेळात मतदान होईल, तर गुुरुवारी, दि.26 रोजी सकाळी 9 वाजता याचठिकाणी मतमोजणी होईल. मनपासाठी एकूण 68 नगरसेवक मतदार होते. त्यातील शिवसेनेच्या एकाचे सदस्यत्व रद्द झाल्याने आता 67 जण मतदानाचा हक्क बजावतील.
मनपा क्षेत्रातील नागरिकांच्या मागास प्रवर्गातून राष्ट्रवादीचे विनीत नाथ पाऊलबुध्दे व शिवसेनेच्या सुवर्णा जाधव यांच्यात सरळ लढत होईल.
तर,सर्वसाधारण प्रवर्गातून अमोल येवले व अनिल शिंदे हे दोघे जण रिंगणात राहिले आहेत. हे दोघेही शिवसेनेचेच आहेत.
येवले हे माजी आमदार अनिल राठोड यांना माननारे आहेत. तर माजी महापौर शीला शिंदे यांचे पती अनिल शिंदे गेल्या काही दिवसांपासून राठोड यांच्यापासून दूर गेलेले आहेत. अनिल शिंदे यांचा गोतावळा, सर्व पक्षात असलेले संबंध यामुळे शिवसेनेची सर्व मते त्यांच्या पारड्यात पडली नाहीत तरी ते इतर मते मिळवू शकतात. येवले यांच्यासाठी स्वतः राठोड प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीने होणार आहे. महिला सर्वसाधारण प्रवर्गातून भाजपच्याआशा शिवाजी कराळे बिनविरोध निवडून आल्या. त्यासाठी सेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी माघार घेतली. तसेच भाजपनेही इतर दोन ठिकाणी अर्ज भरले नाहीत.
अशी असेल निवडणूक प्रक्रिया
मनपाच्या दोन जागांसाठी निवडणूक होईल. त्यात उमेदवाराला पसंतीक्रमांकाने मत द्यायचे आहे. पसंतीक्रमाकांच्या 51 टक्के मते घेणारा उमेदवार विजयी होत असतो. दोन-दोनच उमेदवार असल्याने जरी पहिल्या फे रीत पसंतीक्रमांक पूर्ण केला नाही तरी ज्याला जादा मते तो विजयी घोषित होईल. त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मते मोजण्याचा प्रश्नच येणार नाही.
मतदाराने केवळ आकडी पसंतीक्रम लिहीवयाचा आहे.अक्षरी वा नाव लिहील्यास ते मत बाद होईल.तसेच पहिला वा इतर पसंतीक्रमांक दोन्ही उमेदवारांना सारखाच दिल्यास ते मतही बाद होईल. बॅलेटपेपवर निवडणूक होईल. यात पक्षीय वा कोणतेही चिन्ह नसेल.