नवी दिल्ली – निमलष्करी दलांमधील 81 हजार जवानांनी मागील दशकभरात (2011 ते 2020) स्वेच्छानिवृत्ती पत्करली. त्या कालावधीत सुमारे 16 हजार जवानांनी सेवेचा राजीनामा दिला.
केंद्रीय गृह मंत्रालयाने संबंधित आकडेवारी जारी केली आहे.
ती केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी), सशस्त्र सीमा बल (एसएसबी), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि आसाम रायफल्स या 6 निमलष्करी दलांशी निगडीत आहे.
त्या दलांमधील सर्वांधिक 11 हजार 728 जवानांनी 2017 या वर्षी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. तर, 2013 मध्ये सर्वांधिक 2 हजार 332 जवानांनी राजीनामा दिला. मागील दशकभरात स्वेच्छानिवृत्तीचे पाऊल उचलणाऱ्यांत बीएसएफ जवानांचे प्रमाण (36 हजार 768) सर्वांधिक ठरले.
त्याखालोखाल सीआरपीएफमधील 26 हजार 164 जवानांनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग अवलंबला. मागील दहा वर्षांत सीआयएसएफच्या सर्वांधिक 5 हजार 848 जवानांनी राजीनामा दिला. त्याखालोखाल बीएसएफ (3 हजार 837) आणि सीआरपीएफचा (3 हजार 366) क्रमांक लागला. संबंधित निमलष्करी दलांमध्ये मिळून सुमारे 10 लाख जवान आहेत.
अंतर्गत सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी सीआरपीएफवर सोपवली जाते. दहशतवाद आणि नक्षलवादविरोधी मोहिमांमध्येही त्या दलाचा सहभाग असतो. बीएसएफचे जवान पाकिस्तान आणि बांगलादेशलगतच्या सीमांच्या रक्षणसाठी सज्ज असतात.
देशातील महत्वाच्या आस्थापनांची सुरक्षाव्यवस्था सीआयएसएफकडे सोपवण्यात आली आहे. आयटीबीपीचे जवान भारत-चीन सीमेवर, तर एसएसबीचे जवान नेपाळ, भूतान सीमांवर तैनात आहेत. आसाम रायफल्सचे जवान भारत-म्यानमार सीमेचे रक्षण करतात. ईशान्य विभागातील बंडखोरांच्या कारवाया मोडून काढण्याची जबाबदारीही त्या दलावर आहे.
नेमकी कारणे काय?
जवानांनी स्वेच्छानिवृत्तीचा किंवा राजीनाम्याचा निर्णय घेण्यामागची नेमकी कारणे शोधण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ठोस स्वरूपाचा अभ्यास केलेला नाही. मात्र, संबंधित दलांच्या कारणमीमांसेनुसार व्यक्तिगत आणि कौटूंबिक कारणे, प्रकृतीविषयक समस्या आणि कारकिर्दीशी निगडीत चांगल्या संधी त्या निर्णयामागे असल्याचे मानले जाते.