पंढरपूर : आज आमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराला द्राक्षे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तब्बल एक टन द्राक्षांचा वापर करून विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा सजवण्यात आला होता. मात्र ही सजावट अर्धा तासपण गाभाऱ्यात राहिली नाही कारण फक्त अर्ध्या तासात ही सर्व द्राक्षे गायब झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे.
आमलिका एकादशीनिमित्त पुण्यातील भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तब्बल एक टन द्राक्षांची सजावट केली होती. आज सकाळी सहा वाजता सजावटीनंतर भाविकांना दर्शन सुरु झाले. मात्र केवळ अर्ध्या तासात ही सर्व द्राक्षे गायब झाल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. गाभाऱ्यातील सजावटीनंतर अर्ध्या तासात एक टन द्राक्षंपैकी एकही मणी शिल्लक राहिला नव्हता. दर्शनाला आलेल्या भाविकांनी ही द्राक्षे खाल्ल्याचा दावा केला जात आहे. मात्र दर्शन रांगेच्या बाहेर लावलेले शेकडो द्राक्षांचे घड कोण घेऊन गेले? याविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत.
पुणे आणि बारामती येथील भाविक बाबासाहेब शेंडे, पूनम शेंडे आणि सचिन चव्हाण यांनी ही द्राक्ष सजावट केली आहे. हजार किलो द्राक्षांचा वापर विठ्ठल रुक्मिणी गाभारा सजवण्यासाठी करण्यात आला होता. सध्या आपल्या बागेत पिकलेली द्राक्षे देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी अनेक भाविक येत असतात, मात्र नानासाहेब पाटील यांनी थेट द्राक्ष आणि फुलांच्या मदतीने आकर्षक सजावट केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे. ज्या भाविकांनी ही द्राक्ष सजावटीसाठी दिले त्याच्याही भावना या प्रकाराने दुखावल्या असून या प्रकारात नेमके कोण आहे याचा शोध मंदिर प्रशासनाने तातडीने लावावा आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत अशी मागणी विट्ठल भक्तांनी केली आहे.