मुंबई – महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात मराठी भाषिक जनतेवर तेथील कर्नाटक सरकारकडून मोठ्या प्रमाणात दडपशाही केली जात असून या स्थितीची माहिती घेण्यासाठी सरकारने तेथे सर्व पक्षीय शिष्टमंडळाची भेट घडवून आणावी अशी सुचना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही सुचना केली. ते म्हणाले की गेल्या आठ दिवसांपासून तेथील शिवसेनेच्या नेत्यांवर कन्नड भाषिकांच्या संघटनांकडून हल्ला करण्याचे प्रकार सुरू आहेत. तेथील शिवसेनेच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे.
ते म्हणाले की बेळगाव हाही भारताचाच भाग आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील वाद हा भाषिक वाद आहे. तो फार ताणताकामा नये ही बाब कर्नाटक सरकारनेही ध्यानात घेतली पाहिजे. तेथील परिस्थिती जर हाता बाहेर गेली तर त्या बाबतीत शिवसेना किंवा महाराष्ट्र सरकारला दोषी धरता कामा नये असा इशाराही त्यांनी दिला. तेथील परिस्थितीला जो प्रतिसाद दिला जाईल तो औपचारीक नसेल तर राजकीय असेल असेही त्यांनी म्हटले आहे.
बेळगाव मधील स्थितीला केंद्र सरकारही जबाबदार आहे असा आरोप करून ते म्हणाले की, तेथील मराठी भाषिक जनतेच्या पाठी एकी दाखवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ तेथे नेले पाहिजे. ज्या कन्नड रक्षक वेदिका नावाच्या संघटनेने मराठी भाषिकांवर आणि शिवसेनेवर हल्ले चढवले आहेत ती संघटना भाजपने पुरस्कृत केलेली संघटना आहे असे त्यांनी म्हटले आहे. तेथील घटनांविषयी कोणताही भाजप नेता आज काहीही बोलताना दिसत नाही अशी टिप्पणीही त्यांनी केली. तेथील अत्याचाराला शिवसेनाही त्याच पद्धतीने उत्तर देऊ शकते असेही त्यांनी नमूद केले. परंतु आम्ही दोन राज्यांमध्ये विनाकारण तेढ निर्माण करू इच्छित नाही, त्यामुळे केंद्राने तेथील स्थितीत हस्तक्षेप केला पाहिजे असे ते म्हणाले.
कर्नाटकात सत्तारूढ आमदारांच्या सेक्स सीडींचे प्रकरण सध्या गाजत आहे. त्यावरून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी सीमा भागात हा प्रकार सुरू केला गेला असावा असा आरोपही त्यांनी केला.