मुंबई – मागील दोन वर्षांपासून सारेजग कोरोनाशी लढत आहे. अगदी सुरुवातीला अनेकांची विषाणूची धास्ती घेतली. ती आजही थोड्याफार प्रमाणात आहे.मात्र सर्वजण धीराने सामोरे जात आहेत. प्रतिकार करत आहेत. यात लसीकरण, सामाजिक अंतर, मास्कचा वापर हे संजीवनी ठरत आहे. महत्वाचं म्हणजे भारतातील लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण होतंय. भारतात वर्षभरात १५६ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान, करोनाविरोधात लसीकरण हे सर्वात मजबूत शस्त्र असल्याचं वॉशिंग्टनमधील शास्त्रज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञ डॉ. कुतुब महमूद यांनी एएनआयशी बोलताना म्हटलंय. तर, कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो आणि लवकरच करोना संपेल, असंही त्यांनी सांगितलं.
“करोना कायमस्वरूपी राहू शकत नाही, आणि तो संपेल. हा एक प्रकारचा खेळ आहे आणि या खेळात कोणीही विजेता नाही, हा ड्रॉ होणार आहे. एक वेळ येईल जेव्हा हा विषाणू लपून जाईल आणि आपण खरोखरच जिंकू.
आपल्याला आपल्या मास्कच्या मागे लपून राहावं लागणार नाही, त्यापासून आपली सुटका होईल. या क्षणाच्या आपण खूप जवळ आलोय, असं मला वाटतं. जसजसे आपण या वर्षात पुढे जाऊ, तसतसं आपण लवकरच महामारीतून बाहेर येऊ,” असं डॉ. कुतुब म्हणाले.