राजगुरुनगर : वाशेरे, ता. खेड या गावात रेशन वाटपावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. कोयता, लोखंडी रॉड, दगडाने झालेल्या तुफानी हाणामारीत चार जण गंभीर जखमी झाले असून इतरही दहा ते बारा जण जखमी आहेत. दरम्यान खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
याबाबत स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील वाशेरे येथे रेशन दुकानदार बाबत ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. खेड तहसिलदार यांनी गावात भेट देऊन तक्रारी दुर करण्याचा प्रयत्न केला होता. रेशन दुकानाचा वाद खेड पोलिस ठाण्यापर्यंत आला होता.
मंगळवारी सकाळी वाशेरे येथे पोलिस येऊन ग्रामस्थांची बैठक घेऊन वाद मिटविणार होते. मात्र सकाळी गावातील एका गटाने रेशन दुकांनावर जाऊन रेशन दुकानादार यांच्याशी बाचाबाची केली. त्याचे रूपांतर भांडणात झाले आणि एका गटाने रेशन दुकानावर हल्ला केला. दुकानातील रॉकेल डब्बे फेकुन दिले.
तसेच ७ जणांना काठ्या कोयता, लोखडी गजांनी मारहाण केली. दरम्यान दुसऱ्या गटाने गावतील घरांवर हल्ला करून घरातील संसार उपयोगी वस्तू वितरत्र वस्तू फेकुन दिल्या. तसेच चारचाकी, गाड्याच्या काचा फोडल्या.
या हल्ल्यात १२ जण जखमी झाले आहेत. त्यामधील ४ व्यक्तींना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना पिंपरी चिंचवड येथील डी.वाय पाटील हॉस्पीस्टल दाखल करण्यात आले आहे. उर्वरित ८ जण चांडोली (राजगुरूनगर) येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार घेत आहे. खेड पोलिस ठाण्यात दोन्ही गटाच्या परपस्पर फिर्याद दिल्या आहे. जवळपास २५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर ८० पेक्षा अधिक हल्लेखोर गावातून पळून गेले असून त्यांचा शोध सुरु आहे. रात्री उशिरार्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे करत आहे.
खेड तालुक्यातील वाशेरे गावात गेली दहा ते पंधरा वर्षांपासून गटातटाच्या राजकारणातुन अनेकदा भांडणे झाली आहे कधी निवडणूक तर कधी पाण्यावरून या गावात भांडणे होत असून त्याचे रूपांतर मोठ्या हाणामारीत होत आहे. तालुक्यात केवळ वाशेरे गावात शांतता नाही. कोणत्याना कारणास्तव वर्षानुवर्षे वाद होत आहेत. या गावात पोलीस स्टेशन होणे गरजेचे झाले आहे अन्यथा अनेकांचे खून होतील अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.