चिंबळी-श्रीक्षेत्र आळंदी ते देहू या तीर्थ क्षेत्रातून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीच्या पात्रात पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चिखली येथील सांडपाणी व रसायन मैलामिश्रित सांडपाणी थेट सोडले जात आहे. त्यामुळे चिखलीनंतर आळंदी, मरकळपर्यंतच्या गावांना जणू काही काळ्या पाण्याची शिक्षा दिली की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.्र
इंद्रायणी नदीचे पाणी दूषित झाले असल्याने या परिसरात पिकावर त्याचा दूषित परिणाम झाला आहे. तसेच जलचरांनाही धोका निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असल्याने डासांचे प्रमाणात वाढ झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक असलेल्या श्री जगद्गुरू तुकाराममहाराज व संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पुण्यभूमितून देहू ते आळंदी या तिर्थ क्षेत्रातून वाहत असलेली इंद्रायणी नदी शेतीला वरदान आहे.
या वर्षी चांगला पाऊस झाला असल्याने दरवर्षीच्या तुलनेत नदी अधिक स्वच्छ झाली आहे. सध्या आंध्रा व वडिवळे धरणातून पाणी सोडले असल्याने पाण्याची पातळी वाढली आहे; मात्र पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चिखली येथील सांडपाणी व मैलमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता इद्रायंणी नदीत सोडत असल्याने पाणी काळपट व दूषित झाले असल्याने हे पाणी पिण्यालायक तर सोडाच; परंतु वापरण्यालायकही राहिले नाही. हे पाणी जनावरे सुद्धा पित नसून, कांदा, ज्वारी, गहू आदी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परिसरात डासांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
- जलशुद्धीकरण यंत्रणा बसवा
सध्या मोई, चिखली पुलाजवळच्या ओढ्यावर स्वतंत्र पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी मोई, निघोजे, कुरूळी, चिंबळी, केळगाव, मोशी, डुडूळगाव, आळंदी, चऱ्होली, मरकळ आदींसह नदीलगतच्या भागातील शेतकरी वर्गांनी केली आहे.