दिगंबर पडकर
जळोची – बारामती म्हटले की, विकसित शहर हे समीकरण रुढ होताना दिसून येत आहे. बारामतीत शिक्षण, आरोग्य, क्रीडा, शेती, औद्योगिक आदी विविध क्षेत्रात आमुलागृ बदल झाला आहे. त्यात बारामतीने प्रगती साधली आहे. मात्र, तरी दुसरीकडे तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या देऊळगाव रसाळ या गावातील अनेक वाड्या- वस्त्यांमध्ये ऐन पावसाळ्यातही विकतचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. नेहमीच दुष्काळी गाव म्हणून गणल्या जाणाऱ्या देऊळगाव रसाळमध्ये यंदाही भीषण दुष्काळाची सावट प्रकर्षाने जाणवत आहे.
बारामती तालुक्यातील पश्चिम भाग वगळता इतर उर्वरित तालुक्यात नीरा डावा कालवा वाहत असल्याने हा परिसर सुजलाम-सुफलाम झाला आहे. शेतकरी हित साधण्यासाठी बारामतीत अनेक संस्था, संघटना, संघ उभ्या असून त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेती क्षेत्राला बारामतीत अनुकूल वातावरण असताना पश्चिम भागात मात्र कायम दुष्काळी परिस्थिती असते. दुष्काळी गावांपैकी देऊळगाव रसाळ हे एक गाव आहे.
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने सर्वत्रच दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तशीच स्थिती देऊळगाव रसाळ या सुमारे चार हजार लोकसंख्या असणाऱ्या गावातही दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. ऐन पावसाळ्यातही रसाळवाडी, तळ्यातील रसाळवाडी, पाटलू रसाळवाडी, पवार वस्ती, पेटकर वस्ती, पानमळा, पानमळा एक, आंब्याचा मळा, बेलीचा मळा, गोविंदनगर, गणेशनगर, सोनपीरवाडी, गावकर या भागातील शेतीचा व जनावरांच्या पाण्याचा, चाऱ्याचा बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे.
नागरिकांना पिण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे. लोकसहभागातून मोफत टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. बोअर आटल्या असून केवळ हंडाभर पाणी घेणे इतकेच बोअर चालत आहे. काही विहिरींनी तळ गाठला असून काही विहिरी कोरड्या थाक पडल्या आहेत. पश्चिम भागात असणाऱ्या देऊळगाव रसाळ या गावात दर तीन वर्षांनी दुष्काळ हा ठरलेलाच आहे. यंदाही दुष्काळाचे भीषण सावट आहे.
या परिस्थितीमुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची जनावरांच्या पाण्याची व चाऱ्याची गैरसोय होत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे अक्षरशा कर्ज घेऊन जनावरांसाठी चारा पिण्यासाठी पाणी विकत घेत आहे. बंदिस्त पाणी आणून पाण्याची सोय करावी. तसेच गावातील प्रत्येक वाड्यावर पिण्याच्या पाण्याचे नळ देऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. अशी मागणी नागरिक करीत आहे.
15 दिवसांतून टॅंकरचे दर्शन
मागील दोन महिन्यांपासून जनावरांना विकतचा चारा आणावा लागत आहे. पिण्याचे पाणीही विकत घ्यावे लागत आहे. गावात पाण्याची समस्या निर्माण झाली असून टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. हा टॅंकर पंधरा दिवसातून एकदा येत आहे तो किमान आठ दिवसांतून तरी एकदा यावा, चाऱ्याची व्यवस्था शासनाने करावी. अशी मागणी येथील नागरिक करीत आहे.
लोकसहभागातून दोन ठिकाणी टॅंकर सुरू
यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 40 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न आहे. पुरंदर उपसा, जानाई शिरसाई या माध्यमातून टंचाईग्रस्त भागातील तलाव भरली जाणार आहेत. तूर्तास लोकसहभागातून दोन ठिकाणी टॅंकर सुरू आहेत. चाऱ्याबाबत नियोजन सुरू असल्याचे गटविकास अधिकारी नितीन बागल यांनी सांगितले.