पुणे – पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थींना त्यांचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध झाले आहेत. ही माहिती कृषी विभागाने दिली.
या योजनेअंतर्गत 14 व्या हप्त्याचा लाभ पुढील महिन्यात जमा होणार असून, केंद्र शासनाने यासाठी लाभार्थींनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बॅंक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. राज्यात सद्यस्थितीत 12 लाख 91 हजार लाभार्थींची बॅंक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात 14 व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.
अतिरक्त कागदपत्रे लागणार नाहीत
यासाठी लाभार्थींनी आपले आधार कार्ड मोबाइल क्रमांक इत्यादीच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे.
हे बॅंक खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासांत जोडले जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. “आयपीपीबी’ मध्ये बॅंक खाते सुरू करण्याची सुविधा गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध आहे.
गावनिहाय याद्या
शेतकरी सन्मान योजनेतील प्रलंबित लाभार्थींची बॅंक खाती पोस्टल बॅंकेत उघडून तो आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या “आयपीपीबी’ कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थींना संपर्क करून “आयपीपीबी’मध्ये बॅंक खाती सुरू करतील.