लखनौ – उत्तर प्रदेशच्या वाराणसीत पोहोचलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना शनिवारी निदर्शनांचा सामना करावा लागला. कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या (सप) कार्यकर्त्यांनी हाथरस प्रकरणावरून स्मृती यांच्या समोर सरकारविरोधी घोषणा दिल्या.
शेतकरी आणि कृषितज्ज्ञांशी संवाद साधण्यासाठी स्मृती वाराणसीत दाखल झाल्या. त्यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. हाथरसमधील पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशा आशयाच्या घोषणा त्यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.
त्यानंतर नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यावर स्मृती यांच्यासमोर सप महिला शाखेने निदर्शने केली. महिला कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेश सरकारचा निषेध म्हणून स्मृती यांना बांगड्या भेट दिल्या. वाराणसी दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना स्मृती यांनी विरोधक हाथरस प्रकरणावरून राजकारण करत असल्याचा आरोप केला.
कुठला राजकीय पक्ष किंवा नेता एखाद्या मुद्द्यावरून राजकारण करू इच्छित असेल तर त्यांना रोखले जाऊ शकत नाही. मात्र, न्याय मिळवून देण्यासाठी नव्हे; तर राजकारणासाठी विरोधक हालचाली करत असल्याचे जनतेला ठाऊक आहे, असे त्या म्हणाल्या.