नवी दिल्ली – काही बॅंकांना कोट्यवधी रूपयांचा चुना लावून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याचा कोणताही ठावठिकाणा लागत नसून त्याच्याशी संपर्कही होऊ शकत नसल्याचे नमूद करत त्याचे वकील इसी आग्रवाल यांनी मल्ल्याची केस लढण्यास सुप्रीम कोर्टात नकार दिला आहे.
मला या व्यक्तीकडून कोणतेही निर्देश येत नसल्यामुळे मला या खटल्यातून मुक्त करा असे आग्रवाल यांनी न्या. डि. वाय. चंद्रचूड आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर सांगितले. भारतीय स्टेट बॅंक आणि विजय मल्ल्या यांच्याशी संबंधित एका प्रकरणात मल्ल्याकडून दोन अनुमती याचिका दाखल करण्यात आल्या असून सर्वोच्च न्यायालयात त्यावर सुनावणी सुरू होती.
त्यावर मल्ल्याची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयाला आपल्याला या प्रकरणातून मुक्त करण्याची विनंती केल्यावर न्यायालयाने त्यांना याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी दिली. न्यायालयात नोंदणी असलेल्या मल्ल्याच्या मेल आयडीवरून त्यालाही हे सूचित करावे असे निर्देश आग्रवाल यांना देण्यात आले.
न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात मल्ल्याला जुलै महिन्यात चार महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आता मल्ल्या न्यायालयात हजर कसा राहील याकडे बघावे अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.