मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची महिला आयोगपदी निवड झाल्यानंतर काही दिवसातच एक व्यक्ती एक पद असे म्हणत चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. मनसेच्या आघाडीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी कुणाची वर्णी लागणार याची सर्वानांच उत्सुकता लागली होती. विद्या चव्हाण यांची निवड करत या प्रश्नाला पुर्णविराम देण्यात आला आहे.
सध्या राज्यातील जिल्हा कमिट्या तशाच राहणार आहेत मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागीय अध्यक्ष पद पहिल्यांदाच देण्याचा निर्णय झाल्याचे फौजिया खान यांनी सांगितले. यावेळी नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी आदींची नियुक्तीही खासदार फौजिया खान यांनी जाहीर केली. यावेळी फौजिया खान यांनी विद्या चव्हाण यांना नियुक्तीपत्र दिले.
विद्या चव्हाण यांनी ही नियुक्ती स्विकारत असल्याचे सांगतानाच महागाईसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाला आहे. महिला वर्ग त्रासाला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे स्पष्ट केले. अनेक महिला पक्षात चांगले काम करत आहेत. मला पक्षाने संधी दिली आहे आणि जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र ठरेन असे सांगतानाच माध्यमाकडून सहकार्य मिळावे अशी अपेक्षाही विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली.