नवी दिल्ली – देशातील हिंदुत्वाची चळवळ ही 1947 सालच्या मुस्लिम जातीयवादाचेच प्रतिबिंब आहे. या हिंदुत्वाचा विजय म्हणजेच भारतीयत्वाच्या कल्पनेचा पराजय असेल, असे कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते शशि थरूर यांनी आपल्या नवीन पुस्तकात म्हटले आहे.
हिंदुत्व ही राजकीय तत्वप्रणाली आहे. हा काही धार्मिक विचार नाही, असे थरूर यांनी म्हटले आहे. “हिंदू भारत’ हा हिंदू अजिबात नसेल. तर ते “संघी हिंदुत्व’ असेल. हे हिंदू राज्य पूर्णपणे वेगळे सेल, असे थरूर यांनी “द बॅटल ऑफ बिलॉंगिंग’ या शनिवारी प्रकाशित झालेल्या पुस्तकात म्हटले आहे.
“माझ्यासारख्या लोकांना आमचे प्रेम असलेला भारत जतन करावेसे वाटते. या देशाचे रुपांतर धार्मिक राज्यामध्ये व्हावे असे आम्हाला वाटत नाही. अशा धार्मिक राज्याचा तिरस्कार करतच आम्ही मोठे झालो.’ असे थरूर यांनी म्हटले आहे.
हिंदुत्वाची चळवळ म्हणजे कट्टरवादाचाच प्रतिध्वनी आहे. अशा कट्टरवादाला नाकारण्यासाठीच भारताची उभारणी झाली आहे, असेही थरूर यांनी या पुस्तकात म्हटले आहे. अलेफ बुक कंपनीने त्यांचे हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकात थरूर यांनी हिंदुत्वावर आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर कडवट टीका केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा भारतीयत्वाच्या मूलभूत पैलूलाच आव्हान देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या पुस्तकातील एक प्रकरण “हिंदू पाकिस्तान’ वादाच्या विषयाला वाहिलेले आहे. पाकिस्तानची हिंदूत्वाची आवृत्ती करण्याच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रयत्नावर आपण पूर्वी जोरदार टीका केली होती. यासाठी आपला स्वातंत्र्यलढा लढला गेलेला नव्हता. आपल्या राज्यघटनेमध्ये मांडण्यात आलेल्या भारताच्या संकल्पनेमध्येही याचा समावेश नव्हता.
भाजपला वाटते त्याप्रमाणे हा केवळ अल्पसंख्यांकांबाबतचा मुद्दा नाही. ज्या प्रमाणे पाकिस्तानमध्ये जशी एकधर्मियांची असहिष्णुता आहे, तसे भारतात होऊ नये. भारताच्या सर्वसमावेशकतेचा माझ्यासारख्यांना अभिमानच वाटतो, असे थरूर यांनी म्हटले आहे.
“हिंदू पाकिस्तान’ च्या निर्मितीसाठी भाजप अनुकूल असल्याबद्दल थरूर यांच्या वक्तव्याबद्दल गेल्यावर्षी वाद निर्माण झाला होता. त्याबद्दल माफी मागण्याची मागणी भाजपने केली होती.
स्वामी विवेकानंदांनी मांडलेल्या हिंदुत्वामध्ये सर्वसमावेशकता होती. हिंदुत्व म्हणजे हिंदुवाद नव्हे. हा एक राजकीय विचार आहे. धार्मिक तत्व नाही, असेही थरूर म्हणाले.
भाजपच्या गेल्या सरकारला राज्यघटनेमध्ये बदल घडवून आणण्याइतके संख्याबळ नव्हते. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणूकीत लोकसभेबरोबर राज्यसभेतही दोन तृतीयांश बहुमत आणि निम्म्या राज्यांचे पाठबळही मिळाले आहे. हाच देशासाठी एक इशारा आहे. देशात प्रतिक्रियावादी धार्मिक राष्ट्रवाद विरुद्ध नागरी राष्ट्रवाद या दोन विरुद्ध विचारप्रवाहांमध्ये द्वंद्व सुरू असल्याचा दावा थरूर यांनी या पुस्तकात केला आहे.