मुंबई – मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. मागील वर्ष भरापासून त्या वयोमानानुसार आजारी होत्या. 2020 मध्ये त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासले होते. आज अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
गेल्या काही काळापासून सीमा त्यांचा मुलगा अभिनव देव यांच्यासोबत मुंबईतील वांद्रे याठिकाणी राहत होत्या. सीमा देव यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुंबईतील गिरगाव येथे जन्म झालेल्या सीमा देव यांना अभिनयक्षेत्रात मोठे यश संपादन केले. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची दोन मुलं आहेत. मात्र मागील वर्षी रमेश देव यांचं निधन झाले. त्यानंतर आज सीमा देव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 4.30 वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सीमा देव यांचे मूळ नाव नलिनी सराफ होते. परंतु, चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांचे नाव सीमा ठेवण्यात आले. 1957 मध्ये त्यांनी ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम करण्यास सुरुवात केली. सीमा देव यांचे ‘आनंद’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट विशेष गाजले. याशिवाय ‘कशी झोकात चालली कोळ्याची पोर, जशी चवथीच्या चंद्राची कोर’ या त्यांच्या गाण्याने सिनेरसिकांनी अक्षरशः वेड लावले होते.